मराठा महाशांतता रॅलीसाठी प्रचंड गर्दी, आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष ….

छत्रपती संभाजीनगर : सगेसाेयऱ्यांचा कायदा करावा आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत आज संपत आहे. मात्र, राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या महाशांतता रॅलीचा शनिवारी शहरात समारोप होत आहे. यावेळी जरांगे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे आणि मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
आज दिवसभर पोलिसांनी शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या जालना रोडवरील वाहतूक बीड बाय पास आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे वळवून आंदोलकानासाठी पूर्णपणे मोकळा ठेवला होता. तर आज अनेक व्यावसायिकांनी या रोडवरील सर्व आस्थापना बंद ठेवल्या होत्या. दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांचे जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात स्वागत करण्यात आले. याशिवाय जालना रोडवर ठिकठिकाणी त्यांच्या स्वआगतासाठी जेसीबी उभे करण्यात आले होते. मराठा समाजासोबत इतर समाज बांधवांनीही आंदोलकांची चहा पाण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनासाठी मराठा बांधव मोठ्या संख्यने रस्त्यावर दिसत होते यामधे महिला , मुली आणि तरुणांचा मोठा सहभाग होता. पोलिसांनी जालना रोडकड़े येणारे सर्व रस्ते बॅण्ड करून चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच ठिकठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेल्या होत्या.
मराठा आरक्षणासाठी आज सिडको बस स्टॅण्ड ते क्रांती चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सकाळपासून हजेरी लावली. चौका चौकात तयारी करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी जय जिजाऊ, जय शिवराज अशाही घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.
दरम्यान २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मोर्चा नेल्यानंतर राज्य सरकारने सगेसाेयऱ्यांचा कायदा करणार असल्याचे आश्वासन देत एक अधिसूचना काढली होती. पण कायदा न केल्याने त्यांनी ८ ते १३ जून दरम्यान अंतरवाली सराटी येथे उपोषण केले. मंत्री शंभूराजे देसाई आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत द्या, अशी विनंती केल्याने जरांगे यांनी उपोषण सोडले होते. राज्य सरकारने मात्र, केवळ वेळकाढूपणा सुरू केल्याचे लक्षात येताच जरांगे यांनी ६ जुलैपासून मराठवाड्यातील विविध शहरांत महासंवाद आणि महाशांतता रॅली सुरू केली. प्रत्येक ठिकाणी मोठा जनसमुदाय सहभागी होत आहे. या रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप होत आहे. सकाळी ११ वाजता सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते क्रांती चौक दरम्यान होत असलेल्या महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सकल मराठा समाजाने केली आहे.
तीनशे क्विंटल अन्नदान
मराठा आरक्षणासाठी रॅलीत शहरात विविध ठिकाणचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी रॅलीतील कार्यकर्त्यांसाठी जेवण बनविण्यासाठी सकाळापासूनच मोठ्या संख्येने शहरातील महिला, पुरुषांनी तयारी केली. यावेळी सेव्हन हिल उड्डाणपुलाच्याखाली काहींनी सकाळपासून पोळ्या आणि भाजी तयार करण्यात आली. रॅलीत शहरातील ठीक ठिकाणी रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसाठी फळ, बिस्कीट, पोळी भाजी, पुरी भाजी तसेच पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वाटप करण्यासाठी स्टोल लावण्यात आले. रॅली परिसरात जवळपास तीस स्टोल लावण्यात आले. यावेळी प्रत्येक स्टोलवर हजारच्या संख्येने पाण्याच्या बॉटल ठेवण्यात आल्या. तसेच बिस्कीट, फळे, खिचडी देखील वाटप करण्यासाठी स्टोल लावण्यात आले. यावेळी जवळपास तीनशे क्विंटल जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती चंद्रकांत भराड यांनी दिली. तसेच जवळपास पाचशे स्वयंसेवकांनी रॅलीतील सहभागी कार्यकर्त्यांच्या सेवेसाठी काम पाहिले.