LoksabhaElection2024 : नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे किंगमेकर यांना वगळून बनणे अशक्य मोदी सरकार !!

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचे निकाल येत आहेत. 370 आणि 400 पार च्या घोषणा देणारा भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) 295 जागांसह तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या विचारात असला तरी 2014 आणि 2019 च्या निवडणूक निकालांप्रमाणे, यावेळी भाजप बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जादूई आकड्यापर्यंत कमी पडताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल येत असताना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे किंगमेकर ठरतील अशी स्थिती आहे. यावेळी नरेंद्र मोदींचा चेहरा निवडणुकीच्या मैदानात असला तरी एनडीएला सरकार करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील असे दिसत आहे. ताज्या ट्रेंडमध्ये, एनडीएला 296 जागा मिळताना दिसत असल्या तरी भारतीय जनता पक्ष (भाजप) सलग तिसऱ्यांदा बहुमतासह मोदी सरकार स्थापन करण्याची संधी गमावत असल्याचे चित्र आहे.
एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की , सलग तिसऱ्यांदा सरकार बनवायचे असेल तर PM मोदींना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन पक्षांच्या भूमिकेवर अवलंबून राहावे लागेल. नितीश आणि नायडू यांच्या भूमिकेच्या आधारे सरकारला निर्णय घ्यावा लागेल. नितीश यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाला (युनायटेड) 14 तर नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाला (टीडीपी) 16 जागा मिळाल्या आहेत. हे दोन्ही पक्ष सध्या तरी एनडीएतही आहेत.
मोदींच्या एनडीएला मिळणाऱ्या 296 जागांमधून या नितीशकुमार, नायडूंना मिळणाऱ्या 30 जागा वजा केल्या तर सत्ताधारी आघाडीच्या 266 जागा येतात, जे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 272 च्या जादुई आकड्यापेक्षा सात कमी आहेत. त्यामुळे नितीशकुमार आणि नायडू यांच्या भूमिकेवर नरेंद्र मोदींचा तिसरा डाव अवलंबून असेल.
मोदींच्या दूताची नितीशकुमारांनी भेट नाही…
दरम्यान परिस्थितीची निकड लक्षात घेऊन सत्ताधारी एनडीएसह विरोधी पक्ष इंडिया आघाडीही सरकार बनवता येईल का या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. एकीकडे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचवेळी बिहार भाजपचे अध्यक्ष आणि त्यांच्याच सरकारमधील उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेण्यासाठी सीएम हाऊसमध्ये पोहोचले आहेत. मात्र, सम्राट चौधरी नितीश कुमारांना भेटू शकले नसल्याच्या बातम्या येत आहेत. नितीश यांनी एक दिवस आधी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती.
आता नितीश सम्राट चौधरींना भेटू न शकल्यानंतर सट्टाबाजार चांगलाच तापला आहे. या अटकळीच्या दरम्यान, आरजेडीने दावा केला आहे की नितीश कुमार यांनी म्हटले आहे की ते सूडाच्या राजकारणाच्या बाजूने नाहीत आणि ते कोणताही मोठा निर्णय घेऊ शकतात. मात्र, जेडीयूचे सरचिटणीस आणि प्रवक्ते केसी त्यागी यांनी आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे.