Aurangabad News Update : फुलंब्रीतही उद्या हिंदू जन आक्रोश मोर्चा…
औरंगाबाद : लव्ह जिहाद हा मुख्य विषय घेऊन गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि तालुक्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहरातही या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आता उद्या औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे देखील हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर अशा अनेक विषयांच्या विरोधात हा मोर्चा निघणार आहे. तर या मोर्च्यासाठी फुलंब्री तालुक्यासह परिसरातील नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
मोर्चेकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लव्ह जिहाद, धर्मांतर, हलाल, गोहत्या जिहाद या नावाखाली अनेक घटना घडत आहेत. यात लव्ह जिहादमध्ये फुलंब्री तालुक्यातुन ७ ते ८ हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले. या प्रकरामुळे तालुक्यात सकल हिंदूंमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व हिंदू एकत्रित येऊन हा मोर्चा काढत असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर, फुलंब्री शहरात निघणाऱ्या या मोर्च्यात ५० हजार महिला, पुरुष सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. बाजार समिती प्रवेश द्वारावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मोर्चास प्रारंभ होणार असून, खुलताबाद रस्त्यावर जाहीर सभा होणार आहे. यात धनंजय देसाई हे प्रमुख वक्ते असणार आहे.
या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील ९८ गावांत बैठका झाल्या असून, या गेल्या २० दिवसांपासून काम सुरु असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी विजय औताडे, प्रभाकर मते, प्रमोद मुठ्ठे, योगेश पाथ्रीकर, दत्ता सपकाळ, संजुळचे सरपंच योगेश जाधव, मयूर कोलते, साईनाथ बेडके यांची उपस्थिती होती.
वाहतुकी व्यवस्थेत बदल
फुलंब्री येथील हिंदू जनआक्रोश मोर्च्याच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत बदल केला गेला आहे. ३० जुलै रोजी पोलीस ठाणे फुलंब्री हद्दीतील जाणारे महामार्ग क्रमांक एनएच -७५२ वरील फुलंब्री टी पॉईट ते कृषीउत्पन्न बाजार समिती या महामार्गावर सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याने या मार्गावरुन जाणारी सर्व जड वाहनासह इतर वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने नागरिकांची आणि वाहनधारकांची गैरसोय होवुन नये, म्हणून पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या आदेशानुसार सकाळी ८ वाजेपासून तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे.
या वाहतूक बदलानुसार जळगाव, सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, बीडकडे जाणारी जड अवजड वाहणे खामगाव फाटा, खामगाव, बाबरा, निधोना, आडगाव, वाहेगाव, पिपळगाव वळन, मार्गे देवगिरी साखर कारखाना खुलताबाद कडुन दौलताबाद टी- पॉईट वरुण अहमदनगर, बीड, नाशिक, औरंगाबाद कडे जातील. तर अहमदनगर, बीड, जालना, औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, जळगाव कडे जाणारी जड अवजड वाहने दौलताबाद टी-पॉईंट वरुन खुलताबाद, देवगिरी कारखाना मार्गे पिपळगाव वळन, आडगाव, वाहेगाव, निधोना, बाबरा, खामगाव, खामगाव फाटयावरुण सिल्लोड, जळगावकडे जातील. तर औरंगाबाद ते खुलताबाद फुलंब्री मार्गे जाणारी जड अवजड वाहने औरंगाबाद, चौका, गणोरी फाटा, गणोरी गाव, सगाव फाटा, मार्गे खुलताबादकडे जातील. याशिवाय खुलताबाद ते फुलंब्री मार्गे औरंगाबाद कडे जाणारी वाहने. खुलताबाद, एसगाव फाटा, गणोरी गाव, गणोरी फाटा, चौका, मार्गे औरंगाबाद कडे येतील.