Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraAssemblyUpdate : राज्याच्या वादळी अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ, विरोधी पक्ष नेता आणि प्रतोद कोण ? हे कळीचे मुद्दे

Spread the love

मुंबई : राज्याचे राजकारण चर्चेत असतानाच उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या, सोमवारपासून सुरू होत आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांची संख्या कमी असल्यामुळे विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरताना विरोधकांची चांगलीच कसोटी लागणार आहे. शिवाय आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याने विधानसभेतील विरोधी पक्ष नेता कोण ? तसेच सभागृहात व्हीप नेमका कुणाचा चालणार ? असे कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्याने सत्ताधारी आणि विरोधक या मुद्यांना सामोरे कसे जाणार हा सुद्धा मोठा आहे.

गेल्या पंधरवाड्यातील घडलेल्या घडामोडींमुळे विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ४० आमदार शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या जातीय दंगली, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि शेतकऱ्यांवर ओढवलेले दुबार पेरणचे संकट आदी अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची आयती संधी असताना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे विरोधकांचे संख्याबळ घटले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांची कसोटी लागेल. त्याच वेळी मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिवेसना-भाजप युतीमधील अंतर्गत कलहावरून सरकारला कोंडीत पकडण्याची संधीही त्यांना मिळणार आहे.

समीकरणे बदलली

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून मुंबईत सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. साहजिकच या बदललेल्या राजकीय समीकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटणार असून, ‘राष्ट्रवादी’चे दोन्ही गट आमने-सामने येऊन या वेळी राजकीय कुरघोडीही पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सहभागामुळे विधिमंडळातील विरोधी पक्षाचे संख्याबळ कमालीचे घटले आहे. विरोधी बाकावरून सरकारवर घणाघाती हल्ला करणारे अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सरकारचा भाग झाल्याने विरोधी पक्षाचा आवाज काहीसा क्षीण झाला आहे. या अधिवेशनात विधानसभेत जवळपास २००पेक्षा अधिक आमदार सत्ताधारी बाकांवर दिसणार आहेत.

विरोधी पक्षनेतेपदाचा पेच

अजित पवार ३५ ते ४०आमदारांना घेऊन सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्याने विरोधी पक्षातील आमदारांची संख्या आता ८०च्या आसपास खाली आली आहे. अशातच ‘राष्ट्रवादी’तील फुटीला विधानसभा अध्यक्षांनी अजून मान्यता न दिल्याने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम आहे. विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा असला, तरी जोपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत हे पद रिक्त राहणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचे सुरुवातीचे कामकाज विरोधी पक्षनेत्याविना पार पडण्याची शक्यता आहे.

सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्याची संधी

या अधिवेशनात सरकारी यंत्रणेचा वापर करून अथवा सत्तेचे आमिष दाखवून विरोधी पक्षात पाडली जाणारी फूट, नवी मुंबईत खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ जणांचा झालेला मृत्यू, राज्यात अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी ठिकाणी जातीय,धार्मिक तणाव निर्माण होऊन निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, मुंबईतील वसतिगृहात विद्यार्थिनीची झालेली हत्या, पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांवर ओढावलेले दुबार पेरणीचे संकट, बोगस बी बियाणांची समस्या, कृषी मंत्री असताना अब्दुल सत्तार यांच्यावर धाडी प्रकरणात झालेले आरोप, मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप तसेच नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका आदी मुद्द्यांवरून अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत. याशिवाय सरकारमधील अंतर्गत कलहांचा फायदा उठवत सरकारला कोंडीत पकडण्याची संधी विरोधी पक्षाकडे आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट, भाजप आणि अपक्ष आमदारांचा झालेला हिरमोड तसेच खातेवाटपावरून शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये असलेली धुसफूस या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्याची संधी विरोधकांकडे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!