MaharashtraPoliticalUpdate : उद्या राज्याच्या राजकीय निकालाबरोबरच न्यायव्यवस्थेचाही फैसला : संजय राऊत

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या सर्वोच न्यायालयाच्या निकालाची चर्चा होत आहे . उद्या हा निकाल लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना याबाबत माहिती दिली असल्याने हा निकाल काय असेल याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की , “या देशात लोकशाही आहे की नाही? हा देश विधानसभा आणि संसद संविधानानुसार चालल्या आहेत की नाही, काम करताहेत की नाही, सर्वोच्च न्यायालय, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की कोणाच्या दबावाखाली काम करतंय, याचाही फैसला उद्या लागेल”.
राऊत यांनी पुढे म्हटले आहे की , “आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल, सरकार जाईल राजकारणात या गोष्टी घडत असतात. पण या देशाच्या भविष्याचा फैसला उद्या होईल. पाकिस्तानात तुम्हाला आज संविधान जळताना दिसतंय कारण पाकिस्तानसारखं राष्ट्र आपलं दुश्मन राष्ट्र असलं तरीही ते जळतंय. कारण ते संविधानानुसार चाललं नाही. विरोधकांवर सुडबुद्धीने कारवाया होत आहेत. सरकार पाडली जातायत, सरकारं आणली जातायत. न्यायव्यवस्था विकली गेली, हे चित्र या देशात असू नये. यासाठी उद्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत महत्त्वाचा आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतीवीरांनी, स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं आहे. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानसुद्धा आहे. त्यांच्या रक्षणासंदर्भातील निर्णय उद्या येईल, त्यामुळे आम्ही आशावादी आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
…तर काहीतरी गडबड आहे – संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असाच दावा केला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “न्यायालयाच्याबाबतीत कोणी सांगत असेल की आम्हीच जिंकणार तर त्यांनी काहीतरी गडबड केली आहे. पण मला अजूनही खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे.”