AurangabadNewsUpdate : औरंगाबाद पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना खडे बोल

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबादमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून यावरून नागरिकांमध्ये असंतोष आहे . दरम्यान या मुद्य्यावरून “मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईस्तोवर कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे.” अशा कडक शब्दांत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले.
तसेच, “औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या १६८० कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा. या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल.” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
याचबरोबर, “या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत, ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास, विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.” असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.