AurangabadNewsUpdate : मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहा : सुनील चव्हाण

औरंगाबाद : मान्सुन काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी पूर्ण करुन घ्यावी. जिवीत व वित्त हानी टाळण्याकरीता प्रत्येक तालुका निहाय सर्वेक्षण करुन यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच सर्वच विभागाच्या समन्वायातून आपत्ती निवारणाच्या काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज मान्सुनपूर्व तयारी बाबत श्री.चव्हाण यांच्याअध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महानगर पालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी संबंधित यंत्रणेचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घ्या…
पावसाळ्याच्या काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून श्री.चव्हाण म्हणाले की, संबंधित सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालयाच्या मिटींग हॉल मध्ये आपत्ती नियंत्रण कक्ष व संबंधित साहित्य व लाईफ बॉय यांचे नाव नंबर दर्शिनी भागात लावावेत याशिवाय महानगर पालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, महावितरण, महापारेषण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, परिवहन विभागाने अधिक दक्ष राहावे. पावसाळ्यात प्रामुख्याने नदीकाठच्या गावांबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामध्ये पैठण, गंगापूर व वैजापूर या तीन तालुक्यातील यंत्रणानी अधिक सतर्क राहावे. छोटे नाले, ओढे, नद्या, यांना अचानक येणाऱ्या पुराच्यावेळी दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी.
आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश
ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अतिपर्जन्याची शक्यता आहे तसेच गेल्या वर्षात ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणी स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, शाळा, मंगलकार्यालये, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत. त्या जागी उपचारोबरोबरच औषधी, पाणी, जेवणाची व्यवस्था राहिल याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने छोटे,मोठे पुलांचे सर्वेक्षण करुन त्यांची दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या काठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करुन संरक्षणाचे उपाय योजावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती कामे पूर्ण करावीत. धरणे, पाझर तलाव या ठिकाणी चोवीस तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. पूरप्रणव क्षेत्र,गावे याबाबत लाल व निळ्या गावांबाबत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेसह सतर्क राहावे.
आपत्ती निवारणात सर्व यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक
हवामान खात्याच्या संपर्कात राहून दक्षतेचे इशारे, सुरक्षेचे उपाययोजना म्हणून वेळेत सर्व यंत्रणा व सर्वसामान्य नागरिकांपर्यत माहिती पोहोचवावी. याबाबत जिल्हा नियंत्रण कक्ष , तसेच राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपर्कात रहावे. त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती करुन घ्यावी.
आपत्तीजन्य परिस्थितीत सर्व तहसीलदार यांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे. तसेच पैठण येथील भूकंप मापक यंत्रणा कार्यन्वित करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला श्री.चव्हाण यांना दिले. नद्यांवरील धरणे व बंधाऱ्यावरील गेट सुस्थितीत असल्याबाबत तपासणी करुन तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक, पाणीपातळी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग इत्यादी बाबींचे संनियंत्रण करावे. पाणीसाठा, धरण सुरक्षा, पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करावयाच्या उपाय योजना याबाबत आराखडा निश्चित करावा.
विद्युत विभागाला महत्वाच्या सूचना
वीज पडून मनुष्य हानी होऊ नये म्हणून वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वीत आहे किंवा नाही याबाबत कार्यवाही करावी, आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. सर्व गावांमध्ये पोहोचणारे रस्ते किंवा पर्यायी रस्ते स्थिती तपासून घ्यावी. महावितरणने लोंबकळणाऱ्या तारा, उघड्या डीपी, ट्रान्सफॉर्मर याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. जेणेकरुन वीजप्रवाह खंडित होणार नाही. तसेच जीवतहानी टाळता येईल.
जिल्हाधिकारी कार्यालय, नगर पालिका, तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्रांची स्थापना करावी. बचाव पथकांबाबत सूचना करतांना ते म्हणाले की, आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शोध व बचाव पथके सज्ज ठेवावीत, त्यांना लागणाऱ्या बोटी, इंधन, लाईफ जॅकेट यांची उपलब्धता करुन व्यवस्था करावी. आपत्कालीन परिस्थितीत लाईफ जॅकेट याबाबत तपासणी करुन अद्ययावत आहे किंवा नाही यांची प्रत्येक कार्यालयीने साहित्याची सुव्यस्थित असल्याची पडताळणी करावी, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.