IndiaNewsUpdate : या द्वेषाचे धनी कोण ? सुलतानाशी लग्न केले म्हणून नागराजची तिच्या भावाने भररस्त्यात केली हत्या … !!
हैदराबाद : देशात हिंदू -मुस्लीम असो कि , दलित -सवर्ण दरी आणि द्वेष वाढतच चालला आहे . याच द्वेषातून हैद्राबादमध्ये काल संध्याकाळी पत्नीसह बाईकवरून घरी जाणाऱ्या तरुणाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी सांगितले की 25 वर्षीय कार सेल्समनला त्याच्या मुस्लिम पत्नीच्या भावाने आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. बी नागराजू आणि सय्यद अश्रीन सुलताना यांचा तीन महिन्यांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह झाला होता.
पोलिसांनी दिलेल्बुया माहितीनुसार बुधवारी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य दुचाकीवरून घरातून निघाले असता नागराजू यांना ओढले आणि लोखंडी रॉड व चाकूने त्याच्यावर हल्ला केला. नजीकच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे . विशेष म्हणजे घटनास्थळी गर्दी वेगाने जमत होती परंतु त्याच्या पत्नीशिवाय कोणीही हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही मात्र अनेकांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये शूट केली.
गजबजलेल्या रस्त्यावर नागराजूचा मृत्यू…
अचानक जीवघेणा हल्ला होताच नागराजू कोणत्याही प्रतिकाराविना निपचित पडला यावेळी केवळ त्याची पत्नी मदतीसाठी ओरडत होती आणि भावांना आवरत होती मात्र तिचे पाषाण ह्रदयी भाऊ त्याला खलास केल्यानंतरच शांत झाले . एका व्हिडिओमध्ये सुलताना हल्लेखोर नागराजवरील दुसरा हल्ला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी हल्लेखोरांवर हल्ला केला, त्यानंतर ते तेथून पळून गेले. सुलतानाने नंतर हल्लेखोर आपला भाऊ असल्याचे ओळखले. काही सेकंदात सगळं संपलं. गजबजलेल्या रस्त्यावर नागराजूचा मृत्यू झाला, पण त्याला कोणीही वाचवू शकले नाही.
आम्हाला मदत करायला कोणीच नव्हते…
आज मीडियाशी बोलताना सुलताना म्हणाली, ‘त्यांनी माझ्या पतीला रस्त्याच्या मधोमध मारले. पाच जणांनी हल्ला केला. माझा भाऊ आणि इतर सहभागी होते. आम्हाला मदत करायला कोणीच नव्हते. मी सर्वांना विनंती केली. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी माझ्या पतीला मारले. कोणीही आम्हाला मदत केली नाही . त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली . त्यांच्या डोळ्यासमोर हे सर्व घडत होते . त्याला वाचवता यावे म्हणून मी त्याच्यावर पडले पण तरीही त्यांनी मारहाण थांबवली नाही. लोखंडी रॉडने वार करून त्याचे डोके फोडले.
हल्लेखोर पळून गेले पण सुरक्षा कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेल्या मोबाईल फोनच्या व्हिडिओमध्ये ते पकडले गेले. कॅमेऱ्यात दिसलेल्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. नागराजू आणि सुलताना यांचा विवाह 31 जानेवारी रोजी आर्य समाजात झाला. ते 10 वी पासून ते एकमेकांना ओळखत होते, परंतु त्यांचे कुटुंब त्यांच्या धर्माबाहेर लग्न करण्याच्या विरोधात होते.
जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या …
सुलतानाने सांगितले की, तिने यापूर्वी नागराजूपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. ‘मी त्याला सांगितले की मी तुझ्याशी लग्न केले नाही तर मी दुसऱ्याशी लग्न करणार नाही. मी त्याला सांगितले की , माझे जीवन किंवा मृत्यू फक्त तुझ्याकडे आहे. लग्नाआधी दोन महिने मी त्याच्याशी बोलले नाही. लग्नानंतर सुलतानाने तिचे नाव बदलून पल्लवी ठेवले. नागराजू यांना त्यांच्या कुटुंबियांनी धमकावले आणि त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले.
दरम्यान नागराजू यांची बहीण रमादेवी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आम्ही मुलीच्या कुटुंबीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आज मी माझा भाऊ गमावला. तो कुटुंबाचा एकमेव कमावणारा होता. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.