Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : “मम भार्या ..समर्पयामि …” मुळे ब्राह्मण महासंघ खवळला , मिटकरींचा माफी मागण्यास नकार …

Spread the love

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आपल्या भाषणाच्या दरम्यान विनोदाने केलेल्या विधानाच्या ब्राह्मण महासंघाने निषेध केला आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर या विषयावरून ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आधी गांधीगिरीने आणि नंतर जशास तशी घोषणाबाजी करीत प्रत्युत्तर दिल्याने ब्राहमण महासंघाच्या कार्यकर्त्यांना काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान या प्रकरणात आपण कोणत्याही समाजाचे नाव घेतले नसून माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान ज्यांच्यासमोर मिटकरी यांनी हे वक्तव्य केले त्यापैकी जयंत पाटील यांनी हा प्रकार माझ्या जिल्ह्याच्या सभेत झाल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले आहे तर धनंजय मुंडे यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत आहे पक्षाचे नाही असा खुलासा केला आहे. 


काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता.

“एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार”, असे  मिटकरी म्हणाले होते.


दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

आता मिटकरी यांचे म्हणणे असे आहे …

मिटकरी यांनी म्हटले आहे कि , “मी संस्कृतचा जाणकार आहे. मला काही प्रश्न समजले नसतील, तर त्याची  मी उत्तरे  मागू शकतो. काही संघटना माफी मागा म्हणत आहेत. कशाची माफी मागायची? जे मला माफी मागा म्हणतायत, त्यांना माझा साधा प्रश्न आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही काही बोलले नाही. मी राजकारणात नंतर आहे, माझा पिंड समाजकारणाचा आहे. राजमाता जिजाऊंची राजा शिवछत्रपतीमध्ये जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे”, असे मिटकरी म्हणाले.

“कन्या हा काही दान करण्याचा विषय नाही”

“ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचे  नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये. माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचं काम विरोधकांकडून होतंय. माझा पूर्ण व्हिडीओ पाहावा. त्यात कोणत्याही समाजाबद्दल कोणताही अपशब्द वापरला गेलेला नाही”, असं मिटकरी म्हणाले आहेत.

ब्राह्मण समाजातून तीव्र प्रतिक्रिया

दरम्यान मिटकरी यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे कि , “हिंदु धर्मात कधीच मम् भार्या समर्पयामी असा मंत्र नसतो! कदाचित मिटकरीला आमदारकीसाठी सापडलेले हे तंत्र असू शकते..जाहीर खिल्ली आहे ही !!!’ त्यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

या सर्व प्रकरणावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि,    “अमोल मिटकरींच्या विधानामध्ये बरेच विनोद होते. पोट धरून बरेच लोक हसत होते. त्यावेळी लग्नविधीदरम्यानच्या मंत्राचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर मी देखील माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना केली. ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. त्यांची ती मतं असतील. ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा हेतू त्या सभेचा नव्हता. त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतोय. आमची ती भूमिकाच नव्हती. असं वक्तव्य होणं योग्य नव्हतं. त्यांच्या वक्तव्यामध्ये ब्राह्मण समाजाचा उल्लेख नाही. पण मंत्रपठण वगैरेमुळे ब्राह्मण समाजात एक भावना तयार झाली आहे. मी सर्व ब्राह्मण समाजाला विनंती करेन की आमचा तो हेतू नाही. ब्राह्मण समाजासाठी आम्हाला सर्वांनाच आपुलकीची भावना आहे. त्याबाबत आमची कुणाचीही टोकाची भूमिका नाही. माझ्या व्यासपीठावर ते भाष्य झालं, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे.

धनंजय मुंडे  यांचे स्पष्टीकरण

दरम्यान बीड येथे या विषयावर आपले स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे कि , “मिटकरी यांनी केलेलं वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं ते व्यक्तिगत भाष्य होतं. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला,” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मिटकरी यांची पाठराखण केली. तसेच आपण अमोल मिटकरी यांच्याशी बोललो असून त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

“कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. जात-पात, धर्म हे आमच्या अंगालादेखील शिवलेले  नाही. आमच्यासोबत सावलीप्रमाणे हे लोक उभे आहेत म्हणून इथपर्यंत पोहोचल्याची आम्हाला जाणीव आहे,” असं यावेळी मुंडेंनी म्हटलं. “आम्ही मागे हसत असल्याचं दाखवलं जात आहे. पण आम्ही त्याच कारणासाठी हसत होतो याच्यातला संदर्भ कुठेही नाही,” अशीही बाजू त्यांनी मांडली. “अमोल मिटकरी जे बोलले ते वैयक्तिक बोलले, मिटकरी याबाबत स्वतः स्पष्टीकरण देतील,” असं धनंजय मुंडे सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!