CoronaMaharashtraUpdate : रिकव्हरी रेट वाढल्याने राज्याला मोठा दिलासा
मुंबई । राज्यात गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच करोनाच्या नव्या रुग्णसंख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त दिसत असली तरी करोनामुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात अजूनही घट होताना दिसत नाही. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ८९१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा आता ७१ हजार ७४२ इतका झाला आहे. महाराष्ट्राचा एकूण मृत्यूदर आजच्या आकडेवारीनंतर १.४९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
मंगळवारी राज्यातला रिकव्हरी रेट ८५.१६ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर त्याचवेळी ५१ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात करोनामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या नव्या करोनाबाधितांपेक्षा जास्त झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण ४८ लाख २२ हजार ९०२ नागरिकांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ४१ लाख ७ हजार ०९२ रुग्ण करोनावर मात करून बरे झाले आहेत. राज्यातील एकूण करोनाबाधितांपैकी सध्या ६ लाख ४१ हजार ९१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
अद्यापही चिंता २४ जिल्ह्यातील रुग्णवाढीची…
मुंबई : राज्यातील 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र अद्यापही 24 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम आहे. ही कोरोनाची वाढ कमी करणे हे टार्गेट आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.मागील दोन आठवड्याशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे.
दरम्यान राज्यात कोरोना टेस्टिंग कमी केलेली नाही. टेस्टिंग 2.50 लाखांपासून 2 लाख 80 हजारांपर्यंत कोरोना टेस्ट रोज केल्या जात आहेत. टेस्टिंगमध्ये RTPCR टेस्टची संख्या अधिक आहे. आपण 65 टक्के RTPCR टेस्ट करीत आहोत आणि अँटिजनची टक्केवारी 35 टक्के आहे. इतर काही राज्यांच्यामध्ये अँटिजन टेस्टची संख्या अधिक आहे.
राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये वाढ
टेस्टिंगमध्ये कुठेही घट न होता. कोरोनाची रुग्णवाढ, पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर, डिस्चार्स झालेल्या रुग्णांची कमी होत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 84.7 टक्के आहे तर देशाचा रिकव्हरी रेट हा 81 टक्के आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा देशापेक्षा जास्त आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑक्सिजनची मागणी झपाट्याने वाढ असताना ऑक्सिजनची गरज वाढली आहे. तसेच ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजन लीकेज थांबवणे गरजेचे आहे. सध्या आपण 40 हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मागणी केली होती. पण आपल्याला 20 हजार कॉन्सट्रेटर उपलब्ध होतील. लस आणि रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. राज्यात रेमडेसिव्हीर साडेतीन लाखांपर्यंत उपलब्ध होतील.
लसीकरणही लस उपलब्ध झाल्यावर वेगाने सुरु होत आहे. आज राज्यात 9 लाख लसीचे डोस आले आहेत. त्यामुळे 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचं लसीकरण सुरु होईल. राज्यात सर्व ठिकाणी ते पाठवले जातील. 1 कोटी 65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे. हे सर्व नागरिक 45 वर्षांपेक्षा जास्त आहेत.