एमपीएससीच्या विषयावर विरोधकांनी राजकारण करायची गरज नव्हती : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात म्हणाले की, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला याबाबत दुमत नाही, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घातले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यामुळे एमपीएससीने नवीन परिपत्रक काढल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान ते म्हणाले “एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून या विषयावर विरोधकांनी राजकारण करायची गरज नव्हती. सरकार काहीतरी वेगळे करत आहे असे भासवण्याचे काम विरोधकांनी केले असून ते चुकीचे आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातले आणि एमपीएससीला सूचना केल्या. त्यानुसार आज एमपीएससीने नवीन परिपत्रक काढले आहे. तसेच, एमपीएससीने हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते. त्यामध्ये एमपीएससी कुठंतरी कमी पडली. या प्रकरणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली हे दुर्दैव आहे. कोणतेही कारण नसताना विरोधक रस्त्यावर उतरले, या प्रकरणात विरोधकांनीही राजकारण केले तेही दुर्दैव आहे.