AurangabadNewsUpdate : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दोन जिवलग मित्रांना पाठीमागून चिरडले, ट्रक चालक अटक

नक्षत्रवाडीच्या मुख्य रस्त्यावर घडला भीषण अपघात
औरंंंगाबाद : बिडकीनहून दुचाकीने शहरात येणा-या दोन जिवलग मित्रांना नक्षत्रवाडीच्या मुख्य रस्त्यावर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रक चालकाने चिरडले. या भीषण अपघातात एकाचा जागीच तर दुस-याचा रुग्णालयात नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावरुन धुम ठोकलेल्या ट्रक चालकाला संताजी पोलिस चौकीजवळ वाहतूक पोलिसांनी पकडले. हरिलाल भोलाप्रसाद साहू (२७) रा. सुरत गुजराथ याला अटक करण्यात आली आहे. हा अपघात आज (दि.२५) सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. एकनाथ किसन खैरे (वय ३०) आणि नवनाथ तुकाराम शेजूळ (वय ४०, दोघेही रा. तोंडूळी, ता. पैठण) अशी दोघांची नावे आहेत.
बजाज कंपनीत चार ते पाच दिवसांपुर्वी कंत्राटदारामार्फत नोकरीला लागलेले नवनाथ शेजूळ हे पुर्वी क्रेशरवर काम करायचे. त्यांनी तोंडूळी गावात शेती सुध्दा आहे. शेजूळ हे नेहमी कामानिमित्त औरंगाबादला दुचाकीवर यायचे. आज सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास मित्र एकनाथ खैरे यांना सोबत घेऊन शहरात येत होते. यावेळी नवनाथ दुचाकी चालवत होते. तर एकनाथ हे दुचाकीवर पाठीमागे बसलेले होते. नक्षत्रवाडीच्या मुख्य रस्त्यावरुन दोघेही दुचाकीने (एमएच-२०-एफजे-६६७७) शहराकडे येत होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या मालवाहू ट्रक (यूपी-६३-ई-५६३६) चालकाने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकनाथ यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेले. पाठीमागील चाक गेले तर नवनाथ यांच्या कंबर आणि गुप्तांगाला जबर मार लागला. त्यामुळे एकनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघात घडल्यावर नवनाथ यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळै यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रम वडणे करत आहेत.