CoronaIndiaUpdate : चिंताजनक : कोरोनाबाधितांची संख्या ४१ लाखांच्या पुढे, भारताची जगात दुसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल …
देशातील रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याचे कारण देत केंद्र सरकार अनलॉक च्या नादात असताना करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात एकाच दिवसांत ९० हजार करोनाबाधित आढळले आहेत. भारतामध्ये देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसांतील सर्वात मोठी वाढ आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात पहिल्यांदाच ९० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून २४ तासांत एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढण्याची शक्याता आहे. देशात ४१ लाख १४ हजार ७७३करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी सध्या ८ लाख ६२ हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७० हजार ७०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत देशात एक हजार ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४१ लाख १३ हजार ८११ इतकी झाली आहे . देशात आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ८६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशात कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 77.32 टक्के झाले आहे .
या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या आता ४१ लाखांहून अधिक झाल्यामुळे सर्वाधिक बाधितांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर येण्याची दाट शक्यता आहे. अमेरिका आणि ब्राझील हे सर्वाधिक करोनाबाधितांच्या संख्येत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे. जागतिक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या ६१ लाखांहून अधिक झाली आहे. तर, एक लाख ८६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही अधिक नवीन करोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवासांत ब्राझीललाही भारत मागे टाकू शकतो. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये सध्या ४१ लाख २३ हजार करोनाबाधित आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ८६५ करोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवार करोनाबाधितांवर यशस्वी उपचार होण्याचे प्रमाण ७७.३२ टक्के इतका झाला आहे. कोविडबाधितांची संख्या वाढत असताना मृतांचे प्रमाण मात्र कमी होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. भारतात सात ऑगस्ट रोजी करोनाबाधितांच्या संख्येने २० लाखांचा आकडा ओलांडला. तर, २३ ऑगस्ट रोजी ही संख्या ३० लाख इतकी झाली. पाच सप्टेंबर रोजी ही संख्या ४० लाख इतकी झाली. भारतात आतापर्यंत चार कोटी ८८ लाख ३१ हजार १४५ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.