JalnaNewsUpdate : मोठी बातमी : वीरशैव समाजातील मृत व्यक्तीवर, राजूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात केले अंत्यसंस्कार … !!!

जालना जिल्ह्यातील राजूर येथे वीरशैव समाजाच्या दफनभूमीचा मुद्दा शनिवारी पुन्हा एकदा ऐरणीवर आला. वीरशैव समाजातील ज्येष्ठ नागरिकाचं निधन झालं. मात्र, गावात स्वतंत दफन भूमी नसल्याने नातेवाईकांनी पार्थिवावर थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार केले. यावरून तणाव निर्माण झाला असून घटनास्थळी मोठा पोलीस फाटा लावण्यात आला आहे. राजूर येथे वीरशैव समाजाची दफनभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करायचे कुठे, आता हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान शिवा संघटनेच्या मनोहर धोंडे यांच्या वतीने वतीने जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते मात्र, जिल्हा प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
राजूर येथे शनिवारी वीरशैव समाजातील एका ज्येष्ठ नागरिकाचं निधन झालं. गावात वीरशैव समाजासाठी स्वतंत्र दफनभूमी नसल्यानं नातेवाईकांनी पार्थिव थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात नेले आणि जेसीबीने खड्डा खोदून मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पुरलेलं पार्थिव बाहेर काढण्याची विनंती नातेवाईकांना करत आहेत. मात्र, नातेवाईकांनी जमिनीत पुरलेलं पार्थिव बाहेर काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. वीरशैव समाजात दफन झालेलं पार्थिव बाहेर काढता येत नाही, असं सांगण्यात येत आहे. जबरदस्तीनं पार्थिव जमिनीच्या बाहेर काढल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर मृतदेहाची हेळसांड केल्याचा गुन्हा दाखल करू, अशी आक्रमक भूमिका आता वीरशैव संघटनेचे नेते मनोहर धोंडे यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर विचित्र पेच निर्माण झाला आहे.