शिवसेना-भाजपमधील जागावाटप अंतिम टप्प्यात, मित्र पक्षांना देण्यात येणाऱ्या जागांचाही विचार ठरला

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, याबाबत सोमवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही सकारात्मक सूर उमटले. भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते.
शिवसेना-भाजपमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महायुतीत शिवसेना, भाजपसह रिपब्लिकन पक्ष (रामदास आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष, राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार विनायक मेटे यांची संघटना सहभागी होणार आहे. या पक्षांनी विधानसभेसाठी आपल्याला हव्या असलेल्या जागांची संख्या कळवली आहे. मात्र, सेना-भाजपमध्ये जागावाटपाच्या समीकरणाचा तिढा सुटल्यानंतरच छोट्या पक्षांना किती आणि कोणत्या जागा सोडाव्यात हे निश्चित होणार आहे.
मित्र पक्षांनी कितीही जागा मागितल्या, तरी त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या जातील. याबाबत फडणवीस आणि पाटील यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. ज्या जागा सोडणे शक्य आहे, त्यांची कल्पना मित्र पक्षांना दिली जाणार आहे. जानकर, खोत यांच्या पक्षांना पश्चिम महाराष्ट्रातील तर, आठवले यांच्या पक्षाला मुंबईसह अन्य ठिकाणच्या काही जागा दिल्या जाऊ शकतात.