Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संपूर्ण राज्यात पावसाचा कहर

Spread the love

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात दाणादाण उडाली आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, खडवली, कल्याण, रत्नागिरीतील खेड, विदर्भात गडचिरोली, नाशिक आदी भागात नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, खडवलीत तर अनेक जण पुरात अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून खडवलीतील २० जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली आहे.

मुंबईसह कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधे  रात्रीपासूनच पावसाने आणखी जोर धरल्याने आजही बदलापूरहून मुंबईला जाणाऱ्या लोकल ठप्प होत्या. शीव ते कुर्ला स्थानका दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे सेवा कोलमडून गेली होती. चुनाभट्टी आणि टिळक नगर दरम्यान पाणी साचल्याने हार्बरही ठप्प होती. सुदैवाने आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांचे हाल झाले नाहीत. बदलापूर, कल्याण आणि उल्हासनगरमध्येही घराघरात पाणी शिरल्याने येथील रहिवाश्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. त्यातच बारवी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने येथील रहिवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते.

खडवली येथे अडकलेल्यांपैकी सुमारे २० नागरिकांना एअरलिफ्ट करून त्यांना ठाण्यातील कोलशेत एअरबेस येथे सुखरुप आणण्यात आले आहे. आणखी काही अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हॅलिकॉप्टर पुन्हा रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसईतील मिठागर परिसरात सुमारे ४०० कुटुंब अडकल्याचे वृत्त आहे. या कुटुंबांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीम कार्यरत असून अनेकाना वाचवण्याच एनडीआरएफच्या टीमना यश आले आहे.

नाशिककडे जाण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने, मुंबईचा नाशिक मार्गाशी संपर्क तुटला आहे. कसारा घाटात वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाने कहर केला असून गोदावरी नदीलाही पूर आला आहे. संततधार पावसामुळे नाशिकमधील जनजीवन विस्कळीत झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!