खडवली येथे अडकलेले ५८ रहिवाशी सुखरूप
जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. यामुळे जवळपास सर्वच धरणे भरली असून नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन दक्ष असून जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, मंत्रालयातील आपत्ती निवारण अधिकारी कामत हे ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयात पहाटेपासून उपस्थित आहेत. एअर फोर्स आणि एनडीआरएफच्या मदतीने परिस्थितीवर देखरेख ठेवून आपत्तीग्रस्त रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे. आज खडवली जवळील जू गावातील रहिवाशी पाण्यात अडकल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना पाचारण केले. त्यांच्या मदतीने ५८ रहिवाशांची हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्वांना कोलशेत येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.