MaharshtraNewsUpdate : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन
नंदुरबार : नंदुरबारच्या माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी शनिवार, १७ सप्टेंबर सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.
माणिकराव गावित यांच्या राजकारणाची सुरुवात १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून झाली होती. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयी झाले. त्यानंतर सलग नऊ वर्ष ते खासदार म्हणून निवडून आले होते या दरम्यान केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पहिले आहे. लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.
!!..भावपूर्ण श्रद्धांजली..!! pic.twitter.com/HBrrdv4evN
— Bharat Manikrao Gavit (@Bharatgavit1971) September 17, 2022
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये माणिकराव गावित दहाव्यांदा विजयी झाले असते, तर सलग दहा वेळा संसदेचे सदस्य म्हणून निवडून येण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे जमा झाला असता, परंतु मोदी लाटेत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचे सुपुत्र भरत गावित यांनी आपल्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसने के. सी. पाडवी यांना तिकीट दिले. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भरत गावित यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर कन्या निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला.