ShivrajyaBhishekDinUpdate : शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर शिवप्रेमींचा जल्लोष…
“प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।”
अर्थ : प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे दररोज वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’.
रायगड : काल मध्यरात्रीपासूनच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 348 वा राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त शिवभक्तांनी मोठी गर्दी केली असून मोठ्या उत्साहात आज हा सोहळा पार पडत आहे. पहाटे सहा वाजताच ढोल… ताशा… तुतारी… च्या निणादात नगारखान्या समोरील भगवा ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गुलाल आणि बेल भंडाराची उधळण करण्यात येत आहे. गेली दोन वर्षे कोविड निर्बंधांमुळे किल्ले रायगडावर मर्यादीत स्वरूपात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता. मात्र आता निर्बंध हटवल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मावळे किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने पोहोचले आहेत.
आज सकाळी 9.30 वाजता युवराज संभाजीराजे यांनी पालखीतून शिवछत्रपतींची प्रतिमा आणल्यानंतर मेघडंबरी समोर शिवराज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे. दरम्यान मेघडंबरीसमोर विधिवत पूजा झाल्यानंतर शिवछत्रपतींची प्रतिमा पालखीतून वाजत गाजत राज सदर, नगार खाना, होळीचा माळ, सचिवालय, जगदिश्वर मंदीर आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी ही शिवराज्याभिषेक मिरवणूक पोहोचल्यानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे.
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/videos/740615347131209
कालपासून रायगडावर या सोहळ्याची लगबग सुरु आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून शिवप्रेमींसाठी रायगडावर करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली होती. गडावर अन्नछत्र चालू असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह , याचबरोबर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याला वाहनतळ, मोफत शटल बससेवा, अन्नछत्र उभारण्यात आल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. आजचा दिवस केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर या देशासाठी स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा आहे. या प्राश्वभूमीवर राज्य सरकारने ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने १ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला आहे.