MaharshtraEducationUpdate : शाळकरी विद्यार्थी , पालक , शिक्षक यांच्याशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील बंद झालेल्या शाळांची घंटी तब्बल दीड वर्षांनंतर वाजली आहे. या पार्श्वभूमीवर काल राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी आज संवाद साधूनविद्यार्थी हे आपले आधारस्तंभ आहेत त्यामुळे काळजी घ्या आणि आता एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होणार नाहीत असा निर्धार करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना शाळा सुरू झाल्याबद्दल शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायची नाही हा निर्धार करू या आणि आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया. हा संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचे दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे.
आजचा काळ आव्हानात्मक
आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला काळ हा आव्हानात्मक आहे. त्यामुळे सरकारच्या दृष्टीनेही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होते आणि आहे. मुले नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, मी नेहमी या विषयावर टास्क फोर्सशी चर्चा करतो.आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरे वाटत नसेल तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वानी काम करावे. कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व जण आपली जी जबाबदारी आहे ती निश्चितपणे पार पाडाल, असा मला विश्वास आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांच्या खोल्यांची दारे बंद नको, हवा खेळती हवी, शाळेच्या खोल्यांचे निर्जंतुकीकरण करून घ्या तसेच निर्जंतुकीकरण करतांना देखील काळजी घ्या. मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणे, मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी या सर्व नियमांचे पालन करा असेही मुख्यमंत्री म्हणाले.