#JalnaUpdate : शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार मार्चअखेर पर्यंत बंद

जालना शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालय मार्च अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बजावले आहेत. शिवाय जिल्ह्यातील आठवडी बाजारावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाची गांभीर्याने दखल घेऊन आज मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालय मार्च अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बजावले असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार देखील बंद ठेवण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून कोरोनावर मात करण्यासाठी कडक निर्बंध लादले जाणार असले तरी लॉकडाऊन लावण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तशी शक्यता देखील नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. शहरातील विविध भागात होत असलेली नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबधीत यंत्रणेला देण्यात आल्या असून विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सक्त कारवाई करण्यासाठी तातडीने पथकं नियुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी आज मंगळवारी दिल्याचे या सूत्रांनी सांगितले आहे.