अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्याची निवडणूक आयोगाची परवानगी : नवल किशोर राम
पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिली आहे. कोल्हापूर, सांगली प्रमाणे पुण्यातील पूरग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटले होते.
बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यातील मृतांचा आकडा २३ वर पोहोचली असून, अद्याप आठ जण बेपत्ता आहेत. शहरी भागातील नागरिकांना १५ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल. पंचनामे पूर्ण होताच या निधीचा वाटप करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. ग्रामीण भागात सर्वाधिक नुकसान खेडशिवापूर भागात झाले आहे. शहरामध्ये तांगेवाली कॉलनी भागात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे.
पुरातील नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार असून, त्यात टीव्ही, वाहने आणि अन्य नुकसानीचा समावेश केला जाणार आहे. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्याची प्रत ही विमा कंपनीसाठी वापरता येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर २३०० कर्मचारी आणि दोनशेपेक्षा जास्त जेसीबीच्या मदतीने स्वच्छतेचे काम सुरू असून, मदत आणि पुनर्वसनासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशामध्ये वस्तू, घरे, जनावरे आणि तात्पुरते नुकसान झाले असल्यास त्याची नुकसान भरपाई कशाप्रकारे द्यायची, हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली.