मोदी सरकार २ : कोण झाले मंत्री मंडळातून बाहेर आणि जेडीयू ने का नाकारले मंत्रिपद ?
आधीच्या मोदी सरकार १ मधील अरुण जेटली, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू, उमा भारती, राधामोहन सिंह हे प्रमुख चेहरे ‘मोदी सरकार-२’ मध्ये दिसणार नाहीत. जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात समाविष्ट होण्यास नकार दिला आहे तर सुषमा आणि उमा यांनीही आम्हाला मंत्रिपद नको, असे कळवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान मोदी सरकारच्या शपथविधीआधीच अपेक्षित मंत्रिपदं नाकारण्यात आल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘जेडीयू’ने मोदी मंत्रिमंडळात समाविष्ट न होण्याचा निर्णय घेतला तरी जेडीयू नाराज असल्याच्या चर्चा नितीश यांनी फेटाळल्या असून आम्हाला मंत्रिपदाची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आहे. जेडीयूने केंद्रीय मंत्रिमंडळात तीन मंत्रिपदांची मागणी केली होती. त्यात आर. सी. सिंह व लल्लन सिंह यांना केंद्रीय मंत्रिपद तर संतोष कुशवाह यांना राज्यमंत्रिपद मिळावं, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र भाजपने केवळ एकच मंत्रिपद जेडीयूला देऊ केलं होतं. पण ही ऑफर जेडीयूने नाकारल्याचे सांगण्यात येत आहे .
मोदी सरकारचं नवं पर्व सुरू होत असताना अनेक मोठी नावे मंत्रिमंडळातून वगळण्यात आली आहेत. यात आधीच्या सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या काही मंत्र्यांचा समावेश आहे. मनेका गांधी, राधामोहन सिंह, जे. पी. नड्डा, के. जे. अल्फोन्स, विजय गोयल यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.
यापैकी नड्डा यांचे नाव भाजप अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे तर मनेका गांधी या लोकसभेच्या हंगामी सभापती असतील, असे सांगण्यात येत आहे. यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा यांची नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागू शकलेली नाही. राज्यवर्धन राठोड, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, सुभाष भामरे, हंसराज अहीर यांनाही मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे.
दरम्यान अहिर हे पराभूत झाले असल्याने त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकलेली नाही, असे दिसत आहे. याशिवाय एनडीएतील घटक पक्ष अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही.