Loksabha 2019 : मोदींच्या विजयाचे कौतुक करून राहुल गांधी यांनी केला अमेठीतील पराभव मान्य

२०१४ पाठोपाठ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने बाजी मारली. भाजप आणि मित्रपक्षांनी यंदा ३०० चा आकडाही पार केला. या निवडणुकीत महाराष्ट्र आणि देशभरात अनेक दिग्गजांना आपली जागा गमवावी लागली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या अमेठी मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी यांनी बाजी मारली. या निकालानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपला पराभव मान्य केला आहे.
“भाजप आणि आमची लढाई ही विचारधारेची लढाई होती. देशातल्या जनतेने नरेंद्र मोदी आणि भाजपला पुन्हा एकदा पसंती दिली आहे, आणि मला जनतेचा निर्णय मान्य आहे. अमेठीच्या जनतेने स्मृती इराणी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्या अमेठीचा प्रेमाने सांभाळ करतील अशी मला आशा आहे.” राहुल गांधी यांनी मोदींच्या विजयाबद्दल त्यांचं कौतुक केलं.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली होती. मात्र अमेठी हा गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ मानला जात असल्यामुळे राहुल गांधी पुनरागमन करतील अशी आशा होती. मात्र अखेरपर्यंत इराणी यांनी आपली आघाडी कायम राखली. याव्यतिरीक्त उत्तर प्रदेशातही काँग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिलेली आहे. रायबरेलीचा अपवाद वगळता एकाही जागेवर काँग्रेसला यश मिळालेलं नाहीये.