MIMNewsUpdate : धर्मयुद्ध , जिहाद म्हणता हा आचारसंहिता भंग नाही का ? असदुद्दीन ओवैसींचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल…
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचा थेट सामना आहे. दरम्यान एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ओवैसी हे नाव घेतलं पण ते माझा सामना करु शकत नाहीत असं ओवैसी म्हणाले. तसंच मनोज जरांगेचं नाव का घेत नाही तुमची बोबडी वळते का? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.
“लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादमुळे भाजपाचा अनेक जागांवर पराभव झाला असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण मग अयोध्येत तुमचा पराभव कसा झाला? अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस सातत्याने व्होट जिहाद, धर्मयुद्ध असे शब्द बोलत असतात. निवडणूक आचारसंहितेचा हा भंग नाही का? फडणवीस तुम्ही आमदार विकत घेतले तुम्हाला आम्ही चोर किंवा दरोडेखोर म्हणायचं का? असेही सवाल ओवैसी यांनी उपस्थित केले आहेत.
फडणवीसांचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते….
इंग्रज आणि मराठे युद्ध झाले, तेव्हा मुस्लिम मराठ्यांसोबत होते. मालेगावच्या किल्ल्यावर मुस्लिम उभे राहिले आणि इंग्रजांना हरवलं. ते देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वज नव्हते ते ओवैसींचे पूर्वज होतेलढाईत मरणाऱ्यांमध्ये तुमच्या पूर्वजांचं नाव होतं का? नाही तर ओवैसीच्या बापाचे नाव होते. तुमचा हिरो मात्र इंग्रजांना लव्ह लेटर लिहून ‘आय लव्ह’ लिहत होता. देवेंद्र फडणवीस सतत ‘लव्ह जिहाद’ झाला, ‘लँड जिहाद’ झाला, असे म्हणतात. जिथे तुम्हाला मत मिळाले नाही, तिथे व्होट जिहाद झाले. मग तुम्ही अयोध्येत कसे हरलात, हे सांगा, असा सवाल ओवैसींनी विचारला.
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत….
ओवैसी पुढे म्हणाले, “शिंदे फडणवीस तुम्हाला लाज वाटत नाही का, शहरात आठ दिवसाला पाणी येत आहे, कचरा वाढला आहे. फडणवीस तुम्ही औरंगाबादला पाणी दिले नाही. यांच्याकडून काही होत नाही, हे फक्त हिंदू मुस्लिम करतील. मोदी म्हणतात ‘एक है तो सेफ है’. १० वर्षांत मग आम्ही सेफ नव्हतो का? मराठा समाजाची आरक्षणाच्या नावाने फसवणूक करण्यात आली. हे सर्व मिठाई वाटत आहेत. त्यामुळे सोडू नका, मिठाई खा. पण मतदान पतंगाला करा. १५०० मिळत आहेत ते घेऊन टाका, पण मतदान पतंगाला करा. घाबरण्याची तुम्हाला गरज नाही. फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पाहत आहेत, पण तुमच्या स्वप्नांवर माती पडणार आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
“छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. सुन लो ओवैसी हे छत्रपती संभाजीनगर आहे. आता कुणाचा बापही आला तरी छत्रपती संभाजीनगर हे नाव बदलू शकत नाही. एमआयएमची या ठिकाणी सभा झाली. त्या सभेमध्ये एक महिला म्हणाली की, छत्रपती संभाजीनगर नाव कसं झालं? त्यांना हे माहिती नाही की, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते. ज्या छत्रपती संभाजी महाराजांना पडकण्यासाठी औरंगजेब संभाजीनगरमध्ये येऊन बसला. मात्र, ९ वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झुलवत ठेवलं. एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज हरले नाहीत. मात्र, फितुरी झाली नसती तर आमचे छत्रपती संभाजी महाराज कधीच औरंगजेबाच्या हातात आले नसते”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे.
