Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraBandUpdate : मोठी बातमी : हाय कोर्टाच्या आदेशानंतर नंतर उद्याचा महाराष्ट्र बंद बाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला हा निर्णय, उद्धव ठाकरे म्हणाले ….

Spread the love

मुंबई : बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हा बंद बेकायदेशीर असल्याचे म्हणत राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सदर बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक बंद पुकारतील त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून बंद मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही बसणार : उद्धव ठाकरे

दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ज्या तत्परतेने बंदवर निर्णय घेतला तीच तत्परता गुन्हेगारांना शिक्षा देताना दाखवा, याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, पण त्याला वेळ जाऊ शकतो, न्यायालयात अपील करण्याची ही वेळ नाही, मातोश्री जवळच्या चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही बसणार असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शरद पवार यांचे नेत्यांना आवाहन….

“भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा,” अशी प्रतिक्रिया देत , हायकोर्टाने निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसनेही हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटलं आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटले आहे की, “बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते . त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा ,” अशा शब्दांत पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

उद्धव ठाकरे यांची भूमिका….

“उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध होता. हायकोर्टाने तत्परतेने या बंदला मनाई केली आहे. न्यायालय तत्परतेने हालू शकते याचे मला कौतुक वाटते. मी आता कोर्टाकडून अपेक्षा करतो ज्या तत्परतेने तुम्ही निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्ह्यातील आरोपींबद्दल दाखवून त्यांना शिक्षा दाखवावी. हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. पण कोर्टाचा आदर आम्हाला ठेवावा लागतो. याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जावू शकतो. पण तिथे जाणे आणि निकाल यायला वेळ लागतो. या बंदचे कारण वेगळं होतं. सुप्रीम कोर्टात जाण्याची ही वेळ नाही. तिथे गेल्यावर जनतेच्या मनातील उद्रेक उफाळला तर सगळ्यांना कठीण होईल. शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केलं आहे. आम्ही बंद जरुर मागे घेत आहोत पण राज्यभर मविआचे नेते तोंडाला काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन निषेध करणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“बंदला बंद म्हटलं तर आम्ही तोंड बंद करायचे ठरवलं आहे. मोर्चे, संप या गोष्टी शिल्लक आहेत की नाही. याला सुद्धा बंदी केली आहे का? लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत का? मी जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं होतं. बंद दरम्यान दगडफेक करा असं कुठेही म्हटलं नव्हतं. कारण जी गोष्ट घडली आहे त्यामुळे प्रत्येक घरात चिंता निर्माण झालीय. बंद कायद्यानुसार करता येत असेल आम्ही तोंडच बंद करतो. मी स्वतः उद्या ११ वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे. त्यालाही कुणी मनाई केली तर जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!