AurangabadNewsUpdate : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा औरंगाबाद दौरा रद्द ….

औरंगाबाद : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा औरंगाबाद दौरा रद्द झाला आहे. छगन भुजबळ यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे. याबाबत अजित पवार यांच्या दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध करीत गंगापूर तहसीलदारांना निवेदन देऊन इशारा दिला होता. दरम्यान काल शरद पवार यांच्या विरोधात अनेक आरोप केल्यांनतर अजित पवार आज काय बोलतात याकडे लक्ष लागलेले होते मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला. त्यांच्या हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळं हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
अजित पवार आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. गंगापूर येथे आयोजित ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र, मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला अजित पवारांसह सर्वच राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे. या प्रकरणी चार मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान अजित पवारांना येण्यापासून रोखण्यासाठी मराठा आंदोलकांनी कालच गंगापूर तहसीलदारांनाही निवेदन दिले होते . या निवेदनात आंदोलकांनी म्हटले होते की , “राजकीय नेत्यांना आम्ही शांततेने आणि लोकशाही मार्गाने विरोध करणार आहोत. तरी प्रशासनाने कायदा, सुव्यवस्थेचा विचार करुन राजकीय नेत्यांना येण्यापासून रोखावे , अन्यथा याला प्रशासन जबाबदार राहील”.
चौघांना घेतले ताब्यात…
अजित पवार यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या गंगापूर तालुक्यातील चार आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आंदोलकांनी अजित पवार यांच्या दौऱ्याला विरोध करणारे पत्र दिले होते. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत गंगापूरला अजित पवारांनी येऊ नये, असे अवाहन मराठा आंदोलकांनी केले होते.
‘आम्ही साहित्य संमेलनाच्या विरोधात नसून संमेलनाच्या नावाखाली काही राजकीय मंडळी स्वतःचा प्रचार करत असल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असताना सरकार अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. त्यामुळं घटनात्मक पदं भूषवलेल्या राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
संत, महंत मंडळी रात्रंदिवस करत असलेल्या ‘ज्ञानेश्वर रचिला पाया, तुका झालासे कळस’ या महान साहित्य परंपरेला जपणाऱ्या नागरिकांना बोलवणे अपेक्षित होते . मात्र, तसे न करता पदाचा गैरवापर करुन प्रचारासाठी साहित्य संमेलनाचा वापर करणाऱ्यांना आमचा विरोध आहे. आम्ही राजकीय नेत्यांना शांततेने , लोकशाही मार्गानं विरोध करू. तरीही प्रशासनाने कायदा, सुव्यवस्थेचा विचार करुन राजकीय मंडळींना त्या ठिकाणी येण्यापासून रोखावे, अन्यथा याला प्रशासन जबाबदार राहील’, असे निवेदनात म्हटले होते.