महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण , आणखी दोन दिवस मराठवाडा विदर्भ अधिक तापणार !!

महाराष्ट्रात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून त्याचा सर्वाधिक परिणाम विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जाणवत आहे . पुण्यासह मध्य महाराष्ट्रात दिवसाबरोबरच रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . रात्रीही आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याने उकाडा कायम राहणार आहे. उद्या २९ एप्रिल रोजी विदर्भात, मराठवाडा आणि उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून दुपारी आकाश अंशत: ढगाळ राहील . ३० एप्रिल आणि १ मे : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता, पुण्यात कमाल तापमानात किंचित घट होणार असली तरी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता. (पुण्याचे कमाल तापमान ३८ -३९ तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.) उष्णतेच्या लाटेमुळे वाढलेल्या तापमानाने राज्याला सलग चौथ्या दिवशी शनिवारी हैराण केले आहे .
कोकण, महाबळेश्वर वगळल्यास सर्वत्र कमाल तापमानही यावेळी ४० अंशांच्या पुढे गेल्याचे आढळून आले. शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये (४६.७ अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले. सर्वाधिक किमान तापमानाची कोल्हापूरमध्ये (२५.९ अंश सेल्सिअस) नोंद झाली. पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वातावरणातील बदलांमुळे शुक्रवारपासून विदर्भातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उकाडा आता असह्य होत आहे. शनिवारीही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम होता. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान नगर जिल्ह्यामध्ये (४५.१ अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले.
राज्यभरातील शनिवारचे कमाल तापमान (अंश से.)
अकोला ४६.७ , चंद्रपूर ४६.५ वर्धा ४६ अमरावती ४६ जळगाव ४५ नागपूर ४५.३ बीड ४४.४ उस्मानाबाद ४३.६ औरंगाबाद ४३.६ सोलापूर ४३.१ पुणे ४२.९ लोहगाव ४२.५ सातारा ४१.५ कोल्हापूर ३९.९
next-two-days-maharashtra-to-be-in-grip-of-a-heatwave