NCPNewsUpdate : दिल्लीच्या तालकटोरा मैदानावरून गरजले शरद पवार , दिल्लीसमोर झुकणार नाही …!!

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची फेरनियुक्ती झाल्यानंतर आज शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशत बोलताना विविध मुद्य्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले कि , छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, दिल्ली समोर झुकणार नाही. केंद्र सराकरचे महिला धोरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांशी संबंधित तीन काळे कायदे, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आणि सामाजिक, धार्मिक वाद, भारत-चीन सीमारेषेवरील समस्या, देशात वाढत असलेली महागाई अशा विविध मुद्यांचा पवारांनी यावेळी समाचार घेतला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले कि, “ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांकडून आपल्याला प्ररेणा मिळालेली आहे. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या विचारधारेने काम करणं हे आपण आपलं सर्वप्रथम कर्तव्य मानतो. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रगतीशील पक्षाच्या रुपात काम करू इच्छिते. शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही पाहिलात, तर त्यांनी एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडली आहे आणि ती म्हणजे, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकतं त्यांनी स्वाभिमानाचा परिचय दिला आहे. आज आपण एका ऐतिहासिक मैदानात दिल्लीच्या तालकटोरा मैदानात जमलेलो आहोत. याच ठिकाणाहून पेशव्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिलं होतं. मला आनंद आहे की दिल्लीच्या तख्ताला जिथून आव्हान दिलं गेलं होतं, त्या ठिकाणी आज आपलं अधिवशेन आयोजित करण्यात आलेलं आहे.”
शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड
शरद पवार यांची निवड एकमताने झाल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. देशापुढे असलेल्या विविध समस्यांवर सदस्यांनी या बैठकीत प्रस्ताव मांडले. त्यावरही सविस्तर चर्चा झाली. महागाई, ओबीसी आरक्षण, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जाणीवपूर्वक तपास यंत्रणाद्वारे केली दडपशाहीच्या विरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.
आपल्या रोखठोक भाषणात पवार पुढे म्हणाले कि , आपण आपल्या स्वातंत्र्याचं पंच्चाहत्तरवं वर्ष साजरं करत आहोत. या वर्षात देशाने काही संकटं आणि राजकीय चढउतार पाहिले. याच कालावधीत आपण हे देखील पाहिलं की आपले जे शेजारील राष्ट्र आहेत, श्रीलंका, बांग्लादेश या ठिकाणी आपण तानाशाही पाहीली. ज्याचा परिणाम तिथल्या सरकार, संसदीय लोकशाहीवर झाला. काही मोजक्या लोकांच्या हाती तिथली सत्ता गेली होती. मागील ७५ वर्षांत देशात अनेक बदल झाले, आपल्याला समजातील काही वर्गांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
सांप्रदायिक घटकांवर टीका
“ राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे आणि अखंडित राखण्यासोबतच गतीशील विकासाची आज आवश्यकता आहे. काही सांप्रदायिक घटक सातत्याने समाजात जाती आणि धर्माच्या आधारावर विभाजन करू इच्छितात. हा सर्वांसाठी विशेषकरून महिला, अल्पसंख्याक, दलित, आदिवासींसाठी एक फार मोठा धोका आहे. निवडून आल्यानंतर आपण राज्यघटना आणि सर्व धर्मांचा सन्मान करू, अशी शपथ घेतो. परंतु काहीजण शपथ घेतल्यानंतर हिंदुत्व, मंदिर किंवा मशीद सारख्या मुद्य्यांवर वादग्रस्त भूमिका घेऊन, अल्पसंख्यांकाच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आजही करतात. त्यामुळे आपल्याला जागृत राहीलं पाहिजे.” असे म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
आज देशात महागाई अभूतपूर्व पातळीवर पोहचली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, धान्य या सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या करांमुळे सामान्य माणसांवर मोठा भार निर्माण झालेला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया अभूतपूर्व घसरण अनुभवत आहे असेही पवार म्हणाले.