जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत झालेल्या राड्याची “स्टोरी” आहे तरी काय ?
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सभेत झालेल्या राड्याची आज दिवसभर चांगलीच चर्चा सुरु होती . भाजप कार्यकर्त्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत होत होते अखेर या धक्काबुक्कीचे कारण सायंकाळ [पर्यंत स्पष्ट झाले . अमळनेरमध्ये युतीच्या मेळाव्यातीळ हा प्रकार भाजपामधील अंतर्गत गटबाजीतून घडला. या सभेत भाजपाचे माजी आमदार बी. एस. पाटील यांना कार्यकर्त्यांनी मारहाण केली तर भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही या धक्काबुक्कीचा प्रसाद मिळाला . भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या हाणामारीची पार्श्वभूमी अशी आहे कि , गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने पहिल्यांदा स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी ती रद्द करून त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांचा पत्ता कट करण्यामागे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचा गट असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत.
उदय वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील यांच्यात नेतृत्वावरून वाद आहे . डॉ. बी. एस. पाटील यांनी बऱ्याचदा भाजपाच्या वरिष्ठांकडे उदय वाघ यांच्या तक्रार केल्या आहेत. त्यातच स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर डॉ. बी. एस. पाटील यांनी मोर्चेबांधणी करत ऐनवेळी स्मिता वाघ यांचा पत्ता कट केला होता. तसंच डॉ. बी. एस. पाटील यांनी स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचाही उदय वाघ यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना व्यासपीठावर घेऊ नका, असा उदय वाघ गटाचा आग्रह होता. परंतु तो डावलत गिरीश महाजनांनी त्यांना मंचावर बोलावले आणि उदय वाघ यांनी त्यांना मारहाण केली.
अमळनेरमधील सेना-भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली. पाटील यांना सोडवण्यासाठी महाजन पुढे सरसावले. त्यामुळे महाजन यांनादेखील धक्काबुक्की झाली. अंगावरुन धावून आलेल्या काहींना महाजन यांनी आवरून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत हि हाणामारी महाराष्ट्रभर पसरली होती.