RajyasabhaElectionUpdate : राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील ६ जागांसाठी चूरस
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशातील एकूण 15 राज्यांच्या 57 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या सहा जागांचा समावेश आहे. ही निवडणूक 10 जूनला होणार आहे. या निवडणुकीसाठी 31 मे पर्यंत अर्ज सादर करावे लागतील.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसभेच्या 57 जागांच्या निवडणुकीत सहा जागा या महाराष्ट्राच्या आहेत. याचाच अर्थ राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या या सहा जागांवरील राज्यसभा सदस्यांमध्ये पीयूष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, विकास महात्मे, संजय राऊत आणि विनय सहस्त्रबुद्धे यांचा समावेश आहे. या सर्व दिग्गज सदस्यांचा कार्यकाळ येत्या 4 जुलैला समाप्त होणार आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून सहा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्यसभेच्या खासदारांचा निवडणुकीचा कार्यक्रम हा आमदारांच्या संख्येवरुन होतो. महाराष्ट्रात 42 आमदारांचा कोटा आहे. त्याच आधारावर निवडणूक होईल. येत्या निवडणुकीत भाजपच्या तीन जागांपैकी दोन जागा निवडून येतील आणि एक जागा अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडे अतिरिक्त मते आहेत. त्यांच्याकडे सर्वाधिक 106 आमदार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.