IndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जम्मू काश्मीर दौरा , विकासकामांची करणार पायाभरणी

जम्मू : जम्मू काश्मीर मध्ये तणावाचे वातावरण असले तरी आपल्या नियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मूच्या दौऱ्यावर जात आहे. या राज्यातील विकासकामांच्या घोषणा घेऊन पंतप्रधान जम्मूतील सांबा जिल्ह्यात होणाऱ्या पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील औद्योगिक विकासाची पायाभरणी करणार असून या दरम्यान ते प्रथम ग्रामसभेच्या बैठकीला उपस्थित राहून ग्रामसभांच्या बैठकीतून हजारो पंचायतींच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. याच कार्यक्रमात त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशातील सर्व पंचायतींचाही गौरव करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आपल्या जम्मू काश्मीर दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते 38,082 कोटी रुपयांच्या औद्योगिक विकास प्रस्तावांची पायाभरणी होणार असल्याचेही घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान पंतप्रधान 2 जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी करतील आणि त्यासोबत जम्मू-श्रीनगर बोगद्याचे उद्घाटनही करतील. यावेळी दुबईहून आलेल्या गुंतवणूकदारांसोबत मोदी विशेष बैठक घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच पुढील विकास योजनांबाबत चर्चा करण्यासाठी ते एमआर ग्रुप, डीपी वर्ल्डच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.
जम्मू-काश्मीरची ३७० च्या कालमातून मुक्तता केल्या नंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने या दौऱ्याला महत्व आले आहे. पाक सीमेपासून 25 किमी अंतरावर असलेल्या पल्ली गावातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या रॅलीद्वारे जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रवाद, विकास, लोकशाही आणि लोकांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणार आहेत. दरम्यान जम्मू शहराच्या बाहेरील सुंजवान येथे दहशतवादी चकमक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा नवीन सुरक्षा आढावा घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली अधिक सुरक्षित करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या निमित्ताने गुप्तचर यंत्रणेचा आणखी विस्तार करण्यात आला आहे. या रॅलीत एक लाख लोक सहभागी व्हावेत यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात येत आहे.
दरम्यान या रॅलीच्या सुरक्षेशी संबंधित अधिकार्यांनी सांगितले की, सांबा आणि आसपासच्या परिसरात पूर्ण सुरक्षेअंतर्गत बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमाचे ठिकाण सध्या सामान्य लोकांसाठी मर्यादित आहे. कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चौक्या वाढवण्यात आल्या आहेत. महामार्ग आणि त्याच्या लगतच्या रस्त्यांवरील वाहने आणि लोकांना कसून तपासणी केल्यानंतरच पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे.