CoronaMaharshtraUpdate : कोरोनाच्या निर्बंधातून झाले मोकळे आकाश , मास्कची सक्तीही हटली पण उद्यापासून …

मुंबई : महाराष्ट्रात शनिवारपासून म्हणजेच २ एप्रिलपासून मास्क घालणे बंधनकारक असणार नाही. कोविडचे प्रमाण कमी होत असल्याने राज्यातील सर्व कोविड-19 निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्री आणि हिंदू नववर्ष गुढीपाडवा 2 एप्रिलपासून सुरू होत आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मास्क वापरण्याचा सल्ला दिला जाईल परंतु तो यापुढे अनिवार्य राहणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले की, “गुढीपाडवा सुरू होताच महाराष्ट्रात सर्व कोविड निर्बंध उठवले जातील.
All COVID restrictions in Maharashtra will be lifted, as we bring in the new year this Gudi Padwa!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 31, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गुढीपाडवा ही नवीन वर्षाची सुरुवात आहे, जुन्या जागी नवीन कामाला सुरुवात करण्याचा दिवस आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण प्राणघातक कोरोना विषाणूशी यशस्वीपणे लढा दिला आणि आज हे संकट दूर होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा केली की, आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कोरोनाच्या काळात लादण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ एप्रिल) पूर्णपणे हटविण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य सरकारला गेल्या दोन वर्षांपासून अतुलनीय पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांसह राज्यातील सर्व फ्रंटलाइन कर्मचारी आणि सर्व नागरिकांचे आभार मानले. या कालावधीत राज्यातील विविध जाती, धर्म, पंथाच्या नागरिकांनी आपले सण, उत्सव मर्यादित ठेवून संयम पाळल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाचे आभार व्यक्त करून या सर्वांचे आभार मानले.
विशेष म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आता कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूचे 1,225 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच्या एक दिवस आधी, कोरोनाच्या एकूण 1,233 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. सध्या देशात कोरोना विषाणूचे एकूण 14,307 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 1,594 लोक या विषाणूपासून बरे झाले आहेत.