काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात नरेंद्र मोदींचा हल्ला
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. कारण मागील पाच वर्षात या दोन्ही पक्षांविरोधातला जनतेच्या रोष कायम आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नांदेडमधल्या सभेत ही घणाघाती टीका केली. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेची सुरुवात मोदींनी मराठीतून केली. महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी समृद्ध आणि सुरक्षित अशा नवभारतासाठी पुन्हा एकदा एनडीएला मतदान करा, असे आवाहन जनसमुदायाला केले. राहुल गांधी यांच्या वायनाडच्या जागेवरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला. नामदार राहुल गांधी सुरक्षित मतदारसंघात पळाले हे अमेठीच्या लोकांनी लक्षात ठेवावं असाही टोला त्यांनी लगावला.
आपल्या भाषणात मोदी पुढे म्हणाले , सध्या काँग्रेसची महाराष्ट्रातली अवस्था अत्यंत कमकुवत झाली आहे. त्यांच्याकडे आमच्याविरोधात बोलण्यासाठी काही मुद्देही उरलेले नाहीत. त्याचमुळे ते घाबरले आहेत. त्यांची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. ते जहाज जसं बुडत असताना काही लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते तशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. तसंच आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही त्यांनी टीका केली. काँग्रेसने पाकिस्तानसोबत हातमिळवणी केली आहे असाही आरोप त्यांनी केला.
अशोक चव्हाण यांच्या विरोधात बोलायलाही मोदी विसरले नाहीत . ते म्हणाले काँग्रेस पक्ष फुटीरतावाद्यांच्या बाजूने आहे असेही मोदींनी म्हटले आहे. तसेच आदर्श घोटाळा कुणी केला हे तुम्ही विसरलात का? असाही प्रश्न मोदी यांनी नांदेडच्या सभेत विचारला. सोशल मीडियावर काँग्रेसवर कशी टीका होते आहे ते तुम्ही पहात आहात का? असाही प्रश्न नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था टायटॅनिकसारखी आहे. हे जहाज रोज बुडत आहे असेही मोदी यांनी म्हटलं आहे. अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, प्रफुल्ल पटेल यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्यांनी निवडणूक होण्याआधीच मैदान सोडलं आहे असाही टोला मोदींनी लगावला.