MaharashtraNewsUpdate : बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची बातमी निराधार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. बाळासाहेब थोरात यांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे. ‘ही बातमी कुठून आली? त्याचा सोर्स शोधला पाहिजे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात हे काल दिल्लीला गेल्यानं त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती. याबाबत त्यांनी स्वत: वृत्तवाहिन्याकडं बोलताना खुलासा केला आहे. ‘माझ्या राजीनाम्याची बातमी चुकीची आहे. ती कुठून आली माहीत नाही. सध्या तरी तशी कुठलीच चर्चा नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच पद सोडण्याची तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान थोरात यांच्यावर सध्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्याशिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये ते महसूलमंत्री आहेत. तसेच, काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. एकाच व्यक्तीकडे इतक्या जबाबदाऱ्या असल्यामुळं अन्य नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. थोरात यांनी मात्र अशी काही नाराजी नसल्याचं सांगितलं. ‘माझ्याविषयी पक्षात कुणाला व्यक्तिगत नाराजी असण्याचं कारण नाही. मी सर्वांना बरोबर घेऊन जातोय. माझ्या परीनं प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो.
पक्षात कुठलीही गटबाजी नाही. मात्र, एका व्यक्तीकडं इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. याची चर्चा निश्चित होऊ शकते. मी ते नाकारत नाही आणि माझ्या बाजूनं जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात काहीच अडचण नाही. मी स्वत: याबद्दल आधीही पक्षाच्या नेत्यांशी बोललो आहे. पक्षाला वाटत असेल तर एखाद्या तरुण नेत्याकडं जबाबदारी द्यायला माझी हरकत नाही. आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू. नवे नेतृत्व घडवू,’ असं ते म्हणाले. सरकारमधील अन्य एखादा मंत्री प्रदेशाध्यक्ष झाल्यास मंत्रिपद सोडावं लागणार का असं विचारलं असता, ‘कोणाला अध्यक्ष करायचं हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील,’ असं ते म्हणाले.