IndiaNewsUpdate : जम्मू – काश्मीरमध्ये काय चाललंय ? एकमेकांचे विरोधक का येताहेत एकत्र ?

जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू व्हावे यासाठी च्या राजकारणात एकमेकांचे विरोधक असलेले पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे पक्ष आता एकत्र आले आहेत. या दोन पक्षांनी मिळून काही पक्षांना सोबत घेत एका संयुक्त महाआघाडीची स्थापना केली आहे. ५ ऑगस्ट २०१९ च्या पूर्वी काश्मीर खोऱ्याच जी स्थिती होती ती पुन्हा यावी यासाठी आम्ही संघर्ष करणार असल्याचे महाआघाडीची घोषणा करताना या नेत्यांनी म्हटले आहे. या संघर्षाचा मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू करून घेणे हाच असणार आहे. या संयुक्त मोर्चात नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी, सीपीआय-एम, जम्मू-कश्मीर पीपल्स मूव्हमेंट, पीपल्स कॉन्फरन्स आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचा समावेश आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांची नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर या महाआघाडीची घोषणा झाली आहे. गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या घरी या सर्व पक्षांची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह खोऱ्यातील अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. खरे तर, काही आठवड्यांपूर्वी फारूख अब्दुल्ला यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत तयार करण्यात आलेल्या डिक्लरेशनमध्ये कलम ३७० आणि ३५ अ पुन्हा लागू करण्याबाबतचे मुद्दे अंतर्भूत करण्यात आले होते. त्यावेळी या बैठकीला काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. मेहबूबा मुफ्ती यांचा देखील या डिक्लरेशनला पाठिंबा होता.
या बैठकीनंतर या महाआघाडीची घोषणा करण्यासाठी मेहबूबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या महाआघाडीला ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लरेशन’ असे नाव देण्यात आल्याचे फारूख अब्दुल्ला यांनी सांगितले. आमची लढाई ही एक घटनात्मक लढाई आहे. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांचे सर्व हक्क त्यांना परत द्यावेत अशी आमची मागणी आहे. हे हक्क आमच्याकडे ५ ऑगस्ट २०१९ च्या पूर्वी होते, असे फारूख अब्दुल्ला म्हणाले.