IndiaChinaBorderDispute : कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर योग्य उत्तर , पंतप्रधानांचा चीनला इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लद्दाखमधील भारत आणि चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक धुमश्चक्रीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चीनला अत्यंत स्पष्ट शब्दांत चीनला इशारा देताना मोदी यांनी म्हटले आहे कि , भारत कधीही अखंडतेशी तडजोड करणार नाही. जर आम्हाला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ते उत्तर देऊ. कोरोना संकटाच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच लद्दाखमधील भारत-चीन सीमावादाबाबत चर्चा केली. जवानांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदी यांनी भारताला शांती हवी असून आम्हाला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कसे उत्तर द्यायचे हे देखील भारत जाणतो असे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना संकटाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात या राज्यांचा समावेश होता. या राज्यांमध्ये करोना तीव्र गतीने वाढत आहे. दरम्यान भारत चीन हल्ल्याबाबत बोलताना मोदी म्हणाले कि , गलवान खोऱ्यात सीमेवर शहीद झालेल्या जवानांनाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो असे म्हणत देश आपल्या सोबत आहे असा विश्वास त्यांनी शहीद जवानांच्या कुटुबीयांना दिला. कोणत्याही प्रकारची स्थिती असली तरी देखील देश तुमच्या सोबत आहे, असेही मोदी म्हणाले. भारत आपला स्वाभिमान आणि एका एका इंच जमीनीचे संरक्षण करेल असेही ते म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले कि , भारत हा शातीप्रिय देश आहे. आम्ही जगात शांततेचा प्रसार करण्याचे काम केले याला इतिहास साक्ष आहे. आम्ही शेजारी देशांशी मैत्रीच्या नात्याने काम केले. मतभेद झाले तरी देखील वाद निर्माण होऊ नये याचा प्रयत्न केला, असे सांगतानाच आम्ही कधीही कुणाला डिवचत नाही, मात्र आमच्या देशाच्या अखंडतेशी कधीही तडजोड करत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी चीनला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा मी विश्वास देतो, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. भारताच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. भारताला शांती हवी आहे, मात्र कुणी जर आम्हाला डिवचले, तर आम्ही योग्य उत्तर देऊ याबाबत कुणाच्याही मनात शंका असू नये, असेही पंतप्रधान म्हणाले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी शहीद जवानांचे स्मरण केले. आमचे जवान मारता मारता शहीद झाले याचा देशाला गर्व आहे, असे मोदी म्हणाले. आपले भाषण आटोपते घेताना शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी दोन मिनिटांचे मौनही धरले.