#CoronaVirusEffect : चर्चा ५ व्या लॉकडाऊनची , गृहमंत्र्यांनी जाणून घेतली मुख्यमंत्र्यांची मते….

देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असून यामुळे लॉकडाऊन वाढणार की संपणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लॉकडाऊनबाबत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेत शहा यांनी त्यांचे मत आणि विचार जाणून घेतले. ३१ मेनंतर लॉकडाऊनबाबत राज्यांची भूमिका काय आहे. त्यांच्या सूचना काय आहेत, हे शहा यांनी समजून घेतलं. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबाबत सरकारचे मंथन सुरू आहे. तर लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला जाणार हे निश्चित आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सुरत आणि कोलकातामध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे सक्ती कायम राहू शकते. या ११ शहरांमध्ये देशातील ७० टक्के करोना रुग्ण आहेत. तर अहमदाबाद, दिल्ली, पुणे, कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. इथे देशातील ६० टक्के कोरोना रुग्ण आहेत.
ज्या भागात रुग्णसंख्या कमी आहे अशा भागात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देऊन अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. लॉकाडऊनच्या पाचव्या टप्प्यातही ११ शहरांमध्ये नियमांचे कठोर पालन सुरूच राहील असे म्हटले जात आहे.