जगात भारी , हे दोन कोल्हापुरी…प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधीत त्यांनी सायकलवरून गाठली दिल्ली !!

‘दोन गडी कोल्हापुरी’ हा हॅशटॅग घेऊन कोल्हापूरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी सायकलव्दारे दोन हजार किलो मीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत दिल्ली गाठली आहे. आज या तरूणांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी आकाश आणि अनिकेत यांच्या उत्साह वाढवित पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधीत २६ जानेवारीपुर्वी दिल्लीत येण्याचा संकल्प आकाश आणि अनिकेत यांनी केला होता, तो त्यांनी वेळच्या आताच पूर्ण केला. आनंदी जीवनाचा संदेश देत हा प्रवास केला असून प्रवासातही आनंद मिळाल्याचा अनुभव आकाश आणि अनिकेत यांना आला.
या दोन सायकलस्वरांनी दि. २ जानेवारीपासून सुरू झालेला प्रवास दिल्लीत २३ जानेवारीला संपला. हा प्रवास मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरीयाणा या राज्यांमधून झाला असल्यामुळे आपला भारत देश हा किती वैविध्यपूर्ण आहे याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव घेता आला असल्याचे आकाश आणि अनिकेत यांनी सांगितले.
१२ किलो वजन घेऊन हा प्रवास केला असून, या दरम्यान कमीतकमी साहित्य वापरून कस जगता येते याचाही अनुभव आकाश आणि अनिकेत यांना आला. सोबतच रात्रीचे वास्तव्यासाठी मंदिर, मश्चिद, गुरूव्दारा अशा धार्मिक ठिकाणीच थांबले असल्यामुळे त्या-त्या भागातील संस्कृती, भाषा समजली आणि खादयपदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला.
फेसबूकच्या माध्यमातून जोडलेले पण कधीही भेट न झालेले आभासी मित्रांचे ‘रियल’ वास्तव्य या प्रवासामुळे कळले. आभासी जगातील मित्र हे आभासी नसुन खरेच असतात हा विश्वास दृढ झाला. फेसबूकवरील मित्रांनी या संपुर्ण प्रवासाचा खर्च उचलला हे विशेष, असल्याचे आकाश यांनी सांगितले.
फिरस्त्यांना जात, धर्म नसतो, त्यांच्याकडे माणुस म्हणुनच बघितले जात असल्यामुळे माणुसपण किती मोठे आहे हे या प्रवासामुळे शिकता आल्याने विचारांची समृध्दता अधिक वृध्दीगंत झाली, असल्याच्या भावना आकाश आणि अनिकेत यांनी व्यक्त केल्या. सायकल प्रवासाचा पुढील टप्पा हा कोकणाचा असणार आहे. लवकरच हा प्रवास सुरू करणार असल्याचे आकाश आणि अनिकेत यांनी सांगितले.