महाराष्ट्रातील सत्तांतराला मोदी -शहाच जबाबदार , फोन उचलून ते बोलले असते तर युती तुटली नसती : खा. संजय राऊत
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी महाराष्ट्रात बदललेल्या राजकारणाला मोदी -शहा यांना जबाबदार धरताना म्हटले आहे कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्यापैकी एकाने एक फोन उचलला असता आणि जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असती तर युती तुटली नसती .
एका मराठी वृत्तवाहिनीच्या निवडणूक गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य हातातून जाऊ दिलं पण एक फोन करुन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली नाही. मला त्यांच्या या भूमिकेचं आश्चर्य वाटतं आहे. मात्र त्यांनी हे केलं ते चांगलंच झालं आमचा फायदाच झाला असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात पार पडली. जनमताचा कौल भाजपा आणि शिवसेनेला होता. कारण महायुतीला १६१ जागा मिळाल्या. मात्र शिवसेनेने अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत ५० टक्के वाटा अशा दोन मागण्या केल्या. ज्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत काडीमोड झाला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं मिळून एक सरकार महाराष्ट्रात आलं. सुमारे महिनाभर हा सगळा सत्तापेच महाराष्ट्राने पाहिला, अनुभवला. या सगळ्या पेचामध्ये शिवसेनाही दोन पावलं मागे आली नाही आणि भाजपाही दोन पावलं मागे आला नाही. त्यामुळे या दोन मित्रपक्षांची युती तुटली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.
भाजपाच्या नेत्यांशी मला बोलण्याची संधी मिळाली नाही, मिळाली असती तर कदाचित आणखी वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. नंतर जे काही घडलं ते घडलं सुरुवातीच्या टप्प्यात युती होती त्यावेळी किमान एक फोन या दोन नेत्यांपैकी एकाने कोणीतरी उद्धव ठाकरे यांना करायला हवा होता असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.