भारत -पाक तणाव : दिवाळीनिमित्त पाठविलेल्या मिठाईचा पाकिस्तानकडून यावर्षी स्वीकार नाही

भारत-पाक सीमेवर सध्या तणावाचे वातावरण असून नुकतेच पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघनही केले आहे. त्यानंतर भारताने कारवाई करत पाकिस्तानला प्रयुत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त सीमेवर यंदा मिठाईचे आदान-प्रदान करण्यात आले नाही. परंपरेनुसीर, दरवर्षी दिवाळीनिमित्त मिठाईचे आदान-प्रदान होत असते.
दिवाळीनिमित्त भारताकडून मिठाई देण्याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिष्टाचारानुसार पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालय प्रत्येक वर्षी इस्लामाबादमधील सर्व महत्वाच्या पाकिस्तान सरकारच्या कार्यालयांमध्ये मिठाईचे वाटप करत असते. यंदा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेने सुरुवातीला शिष्टाचाराचे स्वागत करत भारतीय उच्चायुक्तालयाने पाठवलेल्या मिठाईचा स्वीकार तर केला, मात्र नंतर लगेचच ती परत देखील केली. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था असून पाकिस्तानातील सत्ता आणि रणनीतीमध्ये या संस्थेचा चांगलाच दबदबा आहे.
भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही देशाच्या दरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. केवळ इस्लामाबादमधील महत्त्वाची कार्यालये, आयएसआय गुप्तचर संस्था किंवा इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनीच नाही, तर सीमेवर तैनात असलेल्या पाकिस्तानी रेंजर्सनी देखील भारताकडून पाठवण्यात आलेल्या दिवाळीच्या मिठाईचा स्वीकार केलेला नाही. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरला असून तो भारताविरुद्ध वक्तव्ये करीत आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरही देखील इतर देशांना आपल्याकडे वळवण्याचा पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत.
याच आठवड्यात पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमधील तंगधार भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. यात भारतीय जवान आणि स्थानिक रहिवाशांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानच्या या कृत्याचे उत्तर देताना भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले चढवले. भारतीय लष्करान केलेल्या या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिक मारले गेले.