महाराष्ट्र विधानसभा २०१९ : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मोदींनी केले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर केले शिक्कामोर्तब

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या संयुक्त सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला तर चढवलाच पण उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या या सभेत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रातील सरकार पुन्हा एकदा स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपाइं नेते रामदास आठवलेही उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मोदींनी मुंबईसह देशात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेवरून काँग्रेस आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईत आणि देशात अतिरेकी हल्ले होत होते तेव्हा काँग्रेसने काय केले. त्यावेळी काँग्रेस कुणाची बाजू घेत होती. दहशतवादी संघटना स्वत:हून हल्ल्याची जबाबदारी घेत असताना काँग्रेसचे नेते मात्र आमच्याच लोकांनी बॉम्बस्फोट घडवल्याचं सांगून अतिरेक्यांना क्लिनचीट देत होते. जेव्हा जेव्हा पीडीतांना न्याय देण्याची वेळ आली, तेव्हा तेव्हा काँग्रेसने अतिरेक्यांची वकिली केली, अशी घणाघाती टीका मोदींनी केली.
तुम्ही पाहत आहात कि , आमचे सरकार आल्यानंतर अतिरेक्यांनी डोके वर काढले नाही. थोडीजरी चूक झाली तरी त्याची किंमत अतिरेक्यांना मोजावी लागली. सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट हे केवळ शब्द नाहीत. तर भाजपच्या धोरणाची ती ओळख आहे, असेही मोदी म्हणाले.
आम्ही नेहमीच पक्षापेक्षा देशाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. राजकारण आमच्यासाठी सेवेचं माध्यम आहे. आम्ही तर भाजपवाले आहोत. आमची नाळ मुंबईशी जुळलेली आहे. भाजपचा जन्मच मुळी मुंबईत झालाय. त्यामुळे मुंबईशी आमचं नातं गर्भ आणि नाळेसारखं आहे, म्हणूनच मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करणे आमचे उत्तरदायित्त्व आहे, असेही मोदी यांनी सांगितलं.
यावेळी मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. कोर्टातून हिरवा कंदिल मिळताच आम्ही शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू करू, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मोदींनी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी विकास कामांवरून काँग्रेसवर जोरदार हल्ले चढवले. आमचं सरकार येताच आम्ही अर्धवट राहिलेले सर्व प्रकल्प मार्गी लावण्यचं काम सुरू केलं. काँग्रेसच्या काळात हे प्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.