Aurangabad Political : अखेर बंडखोर किशनचंद तनवाणी यांची माघार, जैस्वालांचा विजयाचा मार्ग सुकर
एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, रा.काँ मध्ये होणार मत विभाजन
औरंंंगाबाद : विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून कोणत्याही प्रकारे माघार घेणार नाही अशी वल्गना करणारे भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी आली बंडाची तलवार अखेर म्यान करीत सोमवारी (दि.७) माघार घेतली. तसेच एमआयएमने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या जावेद कुरैशी यांनी देखील तलवार म्यान केल्यामुळे आता शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल विरूध्द एमआयएमचे नासेर सिद्दीक्की अशी थेट लढत होणार आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अमित भुईगळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना किती मते खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीच्या उमेदवारासाठी माघार – तनवाणी
गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप युती न करता लढल्यामुळे त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला होता. त्यामुळे यंदा महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी माघार घेतली असल्याचे बंडखोर उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले. तसेच औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी तनवाणी यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणूकीसाठी सेना-भाजपमध्ये झालेल्या जागा वाटपाच्या करारानुसार औरंगाबाद मध्य मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटली होती. त्यामुळे शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच एमआयएमने उमेदवारी देतांना डावलल्याचा आरोप करीत जावेद कुरैशी यांनी देखील बंडाचा झेंडा हाती घेतला होता. गेल्या दोन दिवसापासून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणा-यांची समजूत काढण्यासाठी पक्षपातळीसह स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्यात येत होते.
दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. दुपारी दिड वाजेपर्यंत एकही उमेदवार निवडणूक निर्णय अधिका-यांकडे न आल्याने अधिकृत उमेदवारांचे प्रतिनिधी प्रचंड मानसीक तनावात होते. दुपारी दिड वाजेच्या सुमारास एमआयएमचे बंडखोर उमेदवार जावेद कुरैशी यांनी आपल्या समर्थकासह येवून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भाजपचे बंडखोर उमेदवार किशनचंद तनवाणी हे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, डॉ.भागवत कराड, गजानन बारवाल, सुरेंद्र कुलकर्णी यांच्यासोबत येवून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच मोहम्मद आय्युब खान, सय्यद मतीन सय्यद रशीद, मिकाईल बशीर शेख, सतीश वेताळ, संजय जगताप, संदीप जाधव, शेख कय्युम या अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
निवडणूकीच्या रिंगणात आता १४ उमेदवार
औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात आता १४ उमेदवार उरले आहेत. त्यात प्रदीप जैस्वाल (शिवसेना), अमित भुईगळ (वंचित बहुजन आघाडी), कदीर मौलाना (राष्ट्रवादी काँग्रेस), नासेर सिद्दीक्की (एमआयएम), अॅड.अभय टाकसाळ (कम्युनिस्ट पार्टी), चेतन कांबळे (शेतकरी संघटना), किर्ती शिंदे, नाना म्हस्के, मोईनोद्दीन फारूकी, विनायक भानुसे, सुरेश गायकवाड, लतीफ जब्बार खान, अन्वर अली, अय्यूब खा सलीम खा पठाण या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.