नवविवाहित तरूण अपघातात ठार, गोलवाडी फाटयाजवळ ट्रकची दुचाकीला धडक
काम संपवून घराच्या दिशेने जात असलेल्या नवविवाहित तरूणाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात तो उपचारादरम्यान ठार झाला. हा अपघात औरंगाबाद-नगर रस्त्यावरील गोलवाडी फाटयाजवळ ७सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास झाला. कल्पेश सुभाषचंद्र कासर ( २७, रा. अजिंक्यतारा सैनिक विहार, कांचनवाडी, पैठणरोड) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. कल्पेशचे विस दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश कासर हा शहरातील एका ट्रेडिंग एजन्सीवर कामाला होता. रात्री तो कामानिमित्त वाळुज येथे गेला होता. काम संपल्यावर दुचाकीने (एमएच-२०-ईयू-४२६४) शहराकडे येत होता. यावेळी औरंगाबाद-नगर रस्त्यावरील गोलवाडी फाटयाजवळ पाठी मागून आलेल्या ट्रक (एमपी -०९- एचएच-६५१६) चालकाने त्याला अचानक डाव्या बाजुला वळण घेऊन धडक दिली. या अपघातात कल्पेश गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी तात्काळ गंभीर अवस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना पहाटे सव्वातीनच्या सुमारास कल्पेशचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी ट्रक सोडून पसार झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही अपघातग्रस्त वाहन ठाण्यात आणली. याप्रकरणी कल्पेशचे आत्येभाऊ डॉ. अमर राठी (रा. शिवकृपा अपार्टमेंट, महाराष्ट्र बॅक कॉलनी, गारखेडा) यांनी छावणी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरूध्द तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरिक्षक राहूल चव्हाण पुढील तपास करत आहेत.