सामाजिक संकल्पामुळेच ३७० कलम रद्द करणे शक्य झाले आणि मोदी है तो मुमकिन है : सरसंघचालक मोहन भागवत

समाजाने संकल्प करून वर्षानुवर्ष प्रयत्न केल्यामुळेच कलम ३७० रद्द करणे शक्य झालं आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. तसंच ‘मोदी है तो मुमकिन है’ असं म्हणत त्यांनी या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही केलं आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संघ मुख्यालयात ध्वजारोहण करून मोहन भागवतांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला.
यावेळी भय्याजी जोशीही त्यांच्यासोबत उपस्थित होते. देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे स्मरण आज करायला हवं. तसंच त्यांच्याप्रमाणे आजही देशाने संकल्प करायला हवा असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. समाजाने संकल्प केला म्हणूनच कलम ३७० रद्द करणं शक्य झालं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. हेडगेवार स्मृती मंदिरात आज त्यांनी ध्वजारोहण केलं आहे.
दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाची तुलना हिटलरशाहीशी केली होती. यावर भय्याजी जोशींनी सडकून टीका केली आहे. ‘पाकी प्रधानमंत्रांनी संपूर्ण हिंदू समाजाला एकप्रकारे ललकारले आहे. सरकार याचे योग्य उत्तर देईल.’