अर्बन नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्यांना आमचं सरकार कोणतीही दयामाया दाखवणार नाही – अमित शहा

खडाजंगी चर्चेनंतर लोकसभेत अखेर ‘बेकायदा कृत्यरोधी दुरुस्ती विधेयक २०१९’ (यूएपीए विधेयक) मंजूर करण्यात आले आहे. १९६७ मध्ये इंदिरा गांधी यांनीच हे विधेयक आणलं होतं, असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर हल्लाबोल केला. दहशतवादी कोण? आणि दहशतवादी कोणाला ठरवायचे? याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याचं शहा यांनी सांगितलं. वैचारिक आंदोलनाच्या आडून अर्बन नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्यांना आमचं सरकार कोणतीही दयामाया दाखवणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या विधेयकानुसार दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्यात येणार आहे, असं सांगतानाच दहशतवादाच्या वाढीसाठी रसद पोहोचविणाऱ्यांना, आर्थिक पाठबळ देणाऱ्यांना, दहशतवादी साहित्याचा प्रचार-प्रसार करून तरुणांच्या मनात दहशतवादाची थिअरी रुजवणाऱ्यांना दहशतवादी संबोधायचे की नाही? असा सवाल अमित शहा यांनी केला. दहशतवाद्यांवर कठोर कारवाईने नव्हे तर त्यांच्याशी चर्चा करूनच नियंत्रण आणलं जाऊ शकतं, या विचारांशी कोणीही तसूभरही सहमत नाही. एखाद्याकडे बंदूक असली म्हणजे तो दहशतवादी होत नाही, तर त्याच्या डोक्यात दहशतवादी विचार असतात म्हणूनच तो दहशतवादी बनतो, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. यावेळी त्यांनी यासिन भटकळचं उदाहरण दिलं. या कायद्यात दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या संघटनांना दहशतवादी संघटना घोषित करण्याची तरतूद होती. पण दहशतवादी कारवायांना तडीस नेणाऱ्यांना आणि त्याचे षडयंत्र रचणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्याचा अधिकार नव्हता, या कायद्यातील दुरुस्तीने तो अधिकार मिळाला आहे, असं सांगतानाच यासिन भटकळच्या इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पण भटकळला दहशतवादी घोषित करण्यात आलं नव्हतं. त्याचा फायदा घेत त्याने १२ कारवाया केल्या असंही ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलं. देशात अनेक समाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते सन्मानाने जीवन व्यतित करत आहेत. परंतु, वैचारिक आंदोलनाचं पांघरून घेऊन जे लोक अर्बन नक्षलवादाचा पुरस्कार करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच. आमचं सरकार अशा लोकांना दयामाया दाखवणार नाही, असं शहा यांनी स्पष्ट केलं.