Buldana : कारमध्ये गुदमरल्याने दोन बालकांचा मृत्यू तर आणखी एका बालकाची प्रकृती गंभीर

कारमध्ये गुदमरल्याने दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर पाच वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीनही मुलं एकाच कुटुंबातील असल्याने हा घातपात तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी तीनही मुलं बेपत्ता झाली होती. एकाच कुटुंबातील असलेल्या या मुलांची शोधमोहिम सुरू होती. मुलं सापडली नाहीत तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. एकाच घरातील मुलं असल्यानं पोलिसांना अपहरणाची शक्यता वाटली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता एका कारच्या काचेवर चिमुकलीचा हात दिसला. त्यात तिनही मुलं सापडली. तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांच्यापैकी दोन मुलांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अंगणवाडीत गेलेल्या तीन बालकांचे बुलडाणा शहरातून अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी १५ जुलैच्या दुपारी १ वाजेदरम्यान घडली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शहरातील सीसीटीव्ही ची तपासणी केली. मात्र या बालकांचे थांगपत्ता लागलेला नव्हता तर १६ जुलैच्या रात्री पासून गुरु पौर्णिमा लागत असल्याने हे अपहरण नरबळीसाठी झाल्याची चर्चा वर्तविली जात होती. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
बुलडाणा शहरातील गौळीपुरा भागात राहणारे शेख हनीफ शेख हिरा यांचे दोन नातू आणि नात अंगणवाडीत गेले होते. दुपारी बारा वाजेपर्यंत ही बालकं घरी परत येणं अपेक्षित असताना ते एक वाजेपर्यंत परतले नसल्यानं मुलांची चौकशी केली. त्यानंतर संपूर्ण शहरात या बालकांची शोधाशोध करण्यात आली मात्र ते न मिळून आल्याने याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली होती.