आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला, राजा ढालेंना मुख्यमंत्र्याची आदरांजली

दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, राजा ढाले हे समतेसाठीच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होते.
दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ही चळवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सत्तरीच्या दशकात या चळवळीने केलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देणारा ठरला होता आणि त्यातील राजा ढाले यांचे योगदान अतिशय मोलाचे होते. त्यांच्या निधनाने एक लढाऊ नेता, प्रतिभावंत साहित्यिक आणि परिवर्तनवादी चळवळीचा महत्त्वाचा भाष्यकार आपण गमावला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
आज सकाळी दलित पँथरचे संस्थापक, बंडखोर लेखक, कवी आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते राजा ढाले यांचे निधन झाले. विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.