ParliamentNewsUpdate : महाराष्ट्रात तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या , राहुल गांधी यांचा संसदेत हल्ला बोल…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल उदासीन आहे, तर शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली अधिकाधिक बुडत आहेत.
एक्सवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी सरकारवर कर्जमाफी आणि पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांनी लिहिले की, “कल्पना करा… महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही फक्त एक आकडेवारी आहे का? नाही. ही 767 उद्ध्वस्त घरे आहेत. 767 कुटुंबे जी कधीही सावरू शकणार नाहीत आणि सरकार? गप्प आहे. उदासीनतेने पाहत आहे.” ‘शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत’
राहुल गांधी म्हणाले की, “शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत, बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे.. पण किमान आधारभूत किमतीची हमी नाही. जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण ज्यांच्याकडे कोटी आहेत? मोदी सरकार त्यांचे कर्ज सहजपणे माफ करते.
‘शेतकऱ्याचे आयुष्य अर्धे होत आहे’
ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी म्हणाले होते की ते शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करतील, आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचे आयुष्य अर्धे होत आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांना मारत आहे. शांतपणे, पण सतत आणि मोदीजी स्वतःच्या जनसंपर्काचा तमाशा पाहत आहेत.”
महाराष्ट्र विधानसभेतून विरोधी पक्षाचा सभात्याग
दरम्यान, काल बुधवारी राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि सोयाबीन शेतकऱ्यांना थकबाकी न मिळाल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभेतून दोनदा सभात्याग केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले की, या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी सांगितले की 200 प्रकरणे मदतीसाठी अपात्र घोषित करण्यात आली आहेत, तर 194 प्रकरणांमध्ये चौकशी प्रलंबित आहे.
