ParbhaniNewsUpdate : परभणीत लक्ष्मण हाकेंना आंबेडकरी तरुणांनी का थांबवले ? नेमकं काय झालं ?

परभणी : “ज्या वाल्मीक कराडमुळे बीडच्या मस्साजोगमध्ये अशोक सोनवणे या बौद्ध बांधवावर हल्ला झाला त्याची बाजू घेण्यासाठी तुम्ही मोर्चा काढता. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे हस्तक आहेत,” असा आरोप करत एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना भाषण करण्यापासून रोखले. त्यानंतर हाके यांनी मी भाजपचा नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं. यावेळी काहीसा गोंधळ निर्माण झाल्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी सचिन खरात उठले आणि खरात यांनीही हाके यांना तुम्ही वाल्मीक कराडची बाजू घेऊ नका, असं सुनावलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
“भाजपच्या लोकांनी मंडल आयोगाला विरोध केला होता. भाजपच महाराष्ट्रात बहुजनांमध्ये वाद लावत आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपची आणि वाल्मीक कराडची बाजू घेऊ नका,” असं सचिन खरात यांनी लक्ष्मण हाकेंना उद्देशून म्हटलं.
संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध नेत्यांनी परभणीत जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हेदेखील आज सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र तिथं गेल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना एका आंबेडकरी कार्यकर्त्याने हाके यांना भाषणापासून रोखत तुम्ही भाजप आणि मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप केला.
सोमनाथ सूर्यवंशीचा कसा झाला मृत्यू?
परभणी शहरातील ११ डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलन प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी (३६) यांस ताब्यात घेतले होते. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती. १५ डिसेंबर रोजी सकाळी न्यायालयीन कोठडीत सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी केलेल्या अमाणूष मारहाणीमुळेच मृत्यू झाला असून त्यांची हत्याच झाली आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलेला आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि परभणीती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणावरुन जनआक्रोश मोर्चांच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जात आहेत. या जनआक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात भाषणेही केली जात आहेत. आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करत वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र, आता या जनआक्रोश मोर्चाच्या विरोधात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चे काढले जात आहेत. तसेच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे आमदार धस, अंजली दमानिया व मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध ह्या मोर्चातून आवाज उठवला जात आहे.
परभणीत दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि जेष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवुन देण्यासाठी आंबेडकरी चळवळीकडून मागच्या 25 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे. आज याच आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आले होते. मात्र, यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी हाकेंचे भाषण थांबून तुम्ही वाल्मिक कराड यांची बाजू घेता, तुम्ही भाजपचे हस्तक असून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकाकडून करण्यात आला. यावेळी आरपीआयचे नेते सचिन खरात यांनीही हाकेंना तुम्ही चळवळीतील नेते आहात, तुम्ही वाल्मिक कराडची बाजू घेऊ नका अन्यथा आम्ही तुमच्यासोबत नाहीत असा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.
मी ना भाजपचा हस्तक आहे, ना कार्यकर्ता….
दरम्यान, यानंतर लक्ष्मण हाकेंनीही शेवटी स्पष्टीकरण दिले असून, मी ना भाजपचा हस्तक आहे, ना कार्यकर्ता, मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतली नाही. त्यांच्यासोबत केवळ माझेच फोटो नाहीत, तर शरद पवार, मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांचाही फोटो सर्वांना समान न्याय द्या. मी इथे सोमनाथ सूर्यवंशी यांची खाकी वर्दीकडून हत्या झालीय त्यामुळे 450 किलोमीटर वरून सोमनाथ आणि वाकोडे साहेबाना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे, असे म्हटले. त्यावेळी एका कार्यकर्त्याने कुणीही इथे बाहेरुन येवून राजकारण करू नये असे सचिन खरात आणि हाकेंना उद्देशून म्हटले.